गरमागरम बटाटावडा आणि त्यावर झणझणीत उसळ पाहिली तरी कोणत्याही खवय्याच्या तोंडाला पाणी सुटेल. या वडा-उसळीवर ताव मारायचा असेल तर वसईतील ‘भगवती विलास’ या उपाहारगृहासारखे दुसरे उपाहारगृह नाही. ‘भगवती विलास’ येथे मिळणाऱ्या गरमागरम वडा-उसळवर ताव मारण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी येथे होते. होळी येथील बाजाराजवळ हे उपाहारगृह असल्याने भाजी विक्रेत्यापासून लहान-मोठय़ांपर्यंत सर्वामध्ये ते लोकप्रिय झाले आहे. दिवसाला ४००हून जास्त खवय्ये येथे खास वडा-उसळ खाण्यासाठी येतात. वसईत बटाटावडा उसळ मिळणारे खूप कमी उपाहारगृह आहेत, पण इकडे मिळणाऱ्या वडा-उसळचे वैशिष्टय़ म्हणजे कांदा उकडल्यानंतर राहिलेल्या पाण्याला झणझणीत फोडणी देऊन त्यात वाटाणे आणि इतर मिश्रण टाकून ही उसळ तयार करण्यात केली जाते. उसळीसाठी वापरण्यात येणारे मसालेदेखील घरगुती पद्धतीने तयार करत असल्याने त्याची चवदेखील वेगळीच लागते. सोबत साथीदारीण असलेली आंबट, तिखट, गोड असे विविध खाद्यपैलू चाखायला लावणारी हिरवी चटणी. प्रवीण चिन्नया शेट्टी यांच्या वडिलांनी १९६३ साली या हॉटेलची स्थापना केली होती. म्हणजेच गेल्या ५४ वर्षांपासून हे हॉटेल वसईत उभे असून आपल्या वडिलांचा वसा आज प्रवीण शेट्टी पुढे चालवत आहेत. सुरुवातीच्या काळात मुख्यत: वडापाव, मिसळ, ब्रेड कटलेट, सामोसा हे पदार्थ सुरू करण्यात आले. पहिल्यांदा छोटय़ा गाळ्यात सुरू झालेला हा व्यवसाय खवय्यांच्या पसंतीमुळे बहरत गेला. आता या ठिकाणी भजीपाव, सामोसा, मालपोळे, मिसळ, कांदाभाजी यांसारखे विविध पदार्थ मिळतात. ‘भगवती विलास’मध्ये मिळणाऱ्या पदार्थाची खासियत ही आहे की, चवीत किंवा पदार्थाच्या दर्जात किंचितही फरक झालेला तुम्हाला जाणवणार नाही. काही पदार्थासाठी तर हे दुकान फार प्रसिद्ध आहे. त्यातील एक म्हणजे गुलाबजाम. या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या गुलाबजामची चव वसईत कुठेच मिळणार नाही, असा दावा या उपाहारगृहाने केला आहे. या गुलाबजामची खासियत म्हणजे इथे गुलाबजामसाठी लागणारा खवा खास पद्धतीने तयार करून घेतला जातो, तर येथे पाकातले गुलाबजाम मिळत नसून साखर लावलेले गुलाबजाम मिळतात. मुख्य म्हणजे कधीही गेलात तरी इथे ताजे गुलाबजाम मिळतात. या व्यतिरिक्त येथे जिलेबी पुरी, खाजा, स्वीट गुलगुले हे गोड पदार्थदेखील मिळतात. या स्वीट गुलगुल्यांचे वैशिष्टय़ म्हणजे हे मैदा, केळी आणि साखर यांच्या मिश्रणातून तयार केले जातात. वसईतील हॉटेलमध्ये असे गुलगुले कुठेच मिळत नसल्याने हे खाण्यासाठी खवय्ये आवर्जून येतात. वसईतील सर्वात मोठा बाजार होळी येथे भरतो. त्यामुळे पहाटेपासूनच लोकांची रेलचेल येथे असते. त्यांना सकाळचा नाश्ता घरी बनवणे शक्यच नाही. त्यामुळे या ग्राहकांची सोय व्हावी यासाठी सकाळी साडेपाच वाजल्यापासून नाश्ता सुरू होतो. नायगाव, वसई स्टेशन, वसई गाव, नालासोपारा परिसरातील अनेक खवय्ये खास या उपाहारगृहात येतात. विविध पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कोणताही पदार्थ बाहेरून मागवला जात नाही. फरसाणपासून ते माव्यापर्यंत सर्वच पदार्थ येथेच बनवले जातात. भगवती विलास हॉटेल पत्ता : ‘भगवती विलास’, होळी बाजार, वसई पश्चिम वेळ : सकाळी ५.३० ते रात्री ९.३०