पक्षीप्रेमींचे निरीक्षण; विश्रांतीसाठी योग्य जागा मिळत नसल्याने पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम वसई शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि विकासकामांचा परिणाम तेथील पर्यावरणीय जीवनावर होऊ लागला आहे. वसईतील पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. वसईत दयाळ, भारद्वाज, चिमणी, साळुंख्या, मुनिया, शिंपी, कोकिळा, बुलबुल या पक्ष्यांसोबतच विदेशी पक्षीही पाहावयास मिळतात. हे पक्षी दिवसेंदिवस कमी होत चालल्याचे निरीक्षण वसईतील पक्षिप्रेमींनी मांडले आहे. वसईतील सिमेंट काँक्रीटचे जंगल, त्यामुळे करण्यात येणारी वृक्षतोड, प्रदूषण आणि मुख्यत: पक्ष्यांची करण्यात येणारी शिकार अशा विविध कारणांमुळे वसईतले पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. वृक्षच नसल्यामुळे या पक्ष्यांना मनोऱ्यांचा आधार घेत घरटी बांधावी लागत आहे. विश्रांतीसाठी योग्य जागा मिळत नसल्याने पक्ष्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. काही पक्षी स्थलांतरित होत आहेत. काहींचा शिकारीमुळे मृत्यू होत आहे. निर्मळ तलावाच्या सुशोभीकरणाचा परिणाम निर्मळ तलाव हा देशी-विदेशी पक्ष्यांसाठी अतिशय चांगला अधिवास आहे. या तलावाचे सुशोभीकरण गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तलावाच्या आजूबाजूला आतापर्यंत ६४ प्रजातीच्या अनेक पक्ष्यांच्या नोंदी झाल्या आहेत. परंतु तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामामुळे हा पक्ष्यांचा हक्काचा अधिवास नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तसेच आदिवासी अथवा शिकाऱ्यांकडून या पक्ष्यांची बेचकीने अथवा जाळ्यात अडकवून शिकार केली जात आहे. पक्षिप्रेमी शिकाऱ्यांपासून काही वेळा पक्ष्यांचे संरक्षण करण्यात यशस्वी झाले असले तरी अनेकदा त्यांना याची किंमतही मोजावी लागत आहे. सोमवारी निर्मळ तलाव येथे ‘ग्रेटर पेन्टेड स्त्रइपनेस्ट’ हा पक्षी खाद्याच्या शोधात आला असता असाच शिकाऱ्यांच्या तावडीत सापडला. त्या वेळी नेस्ट च्या पक्षिमित्रांच्या प्रयत्नाने या दुर्मीळ पक्ष्याची सुटका करण्यात आली. प्रशासनाने आणि स्थानिकांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारच्या शिकारी बंद करण्यासाठी मदत करावी अन्यथा पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येईल -सचिन मेन, पक्षीअभ्यासक व अध्यक्ष, नेस्ट