निष्ठावान आणि संघ कार्यकर्ते अन्य पर्यायाच्या शोधात

मुख्यमंत्री, प्रदेश कार्यालयाने कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी अंतिम केलेली भाजप उमदेवारांची यादी स्थानिक पातळीवर आल्यावर त्यात फेरबदल करण्यात आले. आपल्या सोयीच्या उमेदवारांना उमेदवारी देऊन स्थानिक निवडणूक प्रमुखांनी मुख्यमंत्री, प्रदेश कार्यालयाच्या सूचना बेदखल केल्याने निष्ठावान भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाराज झालेला संघ, भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता यावेळी ‘इंजिन’ चालवायचे की ‘धनुष्य’ उचलायचे या विचारात आहे.

कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली पाहिजे म्हणून प्रदेश भाजपने कंबर कसली आहे. भाजपने शहरात केलेल्या एका सव्‍‌र्हेक्षणात कल्याण, डोंबिवलीतील काही प्रभागांमध्ये संघ, गुजराती, मारवाडी, व्यापारी वर्गाला प्रतिनिधीत्व देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. गेल्या काही निवडणुकांमध्ये शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार हेच या भागातील उमेदवारी देण्यापासून निवडणूक यंत्रणा राबवत असल्याने भाजपला या भागात फार यश मिळत नसल्याची विश्वसनीय माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली होती. या सूचनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी यावेळच्या पालिका निवडणुकीपासून तावडे, नरेंद्र पवार यांना दूरच ठेवले. फक्त डोंबिवलीत रवींद्र चव्हाण निवडणूक यंत्रणा योग्य रितीने हाताळतात, अशी मते सव्‍‌र्हेक्षणात आल्याने चव्हाण यांना किमान प्रचारप्रमुख पद देण्यात आले.
भाजपचे खासदार कपिल पाटील निरपेक्षपणे भाजपची निवडणूक विषयक यंत्रणा हाताळतील म्हणून त्यांना पालिका निवडणुकीचे प्रमुख करण्यात आले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच चव्हाण, पवार या दोन्ही आमदारांनी जागोजागी आपल्या उमेदवारांचे नेहमीप्रमाणे ‘सापळे’ लावून ठेवले होते.

या सापळ्यातील उमेदवारांना उमेदवारी देऊ नका म्हणून भाजपच्या काही निष्ठावान मंडळींनी प्रदेश भाजप नेत्यांना गळ घातली होती. परंतु, कपिल पाटील यांचा डोंबिवलीत वावर नसल्याने पाटील यांनी आमदार चव्हाण यांच्या सल्ल्याने डोंबिवलीत प्रभागवार उमेदवार देण्याची गणिते केली. माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी उमेदवारीवरून तोंड उघडले तर, गडबड नको म्हणून त्यांच्या स्वप्नातील नांदिवली भागातील उमेश पाटील या उमेदवाराला भाजपने डोंबिवलीत आयात केले. नरेंद्र पवार यांच्या एकाही समर्थकाला कल्याणमध्ये उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांचा समर्थक गट नाराज असल्याचे समजते.

संघामध्ये नाराजी
डोंबिवलीत संघाच्या एकाही उमेदवाराला त्यांचे वर्चस्व असलेल्या प्रभागात उमेदवारी देण्यात आली नाही. मुख्यमंत्र्यांच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी पाळल्या नाहीत. त्यामुळे नाराज झालेला संघ भाजपची यादी जाहीर झाल्यापासून अस्वस्थ झाला आहे. कपिल पाटील, चव्हाण यांनी उमेदवारी यादीत हेराफेरी केल्याने त्यांना मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती भाजपचा एका निष्ठावान संघ कार्यकर्त्यांने ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली. मुख्यमंत्र्यांनी अंतिम केलेली भाजप उमेदवारांची यादी शहरात आणल्यावर त्यात मनोजोगते उमेदवार देण्यासाठी बदल करण्यात आले. हा विषय मुख्यमंत्र्यांना कळू नये म्हणून भाजपने यादीच प्रसिद्ध केली नाही, असे या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांने सांगितले.

पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून सुमारे ६५० उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. १२२ प्रभागांमध्ये सगळ्याच इच्छुकांना उमेदवारी देणे शक्य नाही. भाजपने उमेदवारांची जी यादी अंतिम केली त्याचप्रमाणे तिकीटवाटप केले आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते थोडेफार कुरबुर करणार. हे सगळ्याच पक्षात असते. ही कुरबुर थांबवण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ. – नरेंद्र पवार, आमदार