एमआयडीसीतील आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रयत्नशील

वसईत औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांमध्ये आग लागून दुर्घटना घडण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. या सर्वाची दखल घेण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यातील संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

वसई-विरार परिसरातील औद्योगिक क्षेत्रात अनेक छोटय़ा-मोठय़ा कंपन्या आहेत. येथे तयार होणारी उत्पादने वेगवेगळ्या भागात निर्यात केली जातात. परंतु औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याने कंपन्यांमध्ये नेहमी स्फोट आणि अपघात होत असतात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. यासाठी वसई-विरार शहर महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यातील संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार संबंधितास आवश्यक त्या आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना करावयाच्या याबाबत माहिती दिली जात आहे. तसेच कंपनीतील कामगार व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखून जीवित व वित्तहानीस बाधा निर्माण होणार नाही, यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या घातक रसायनांचा अतिरिक्त साठा करू नये, आवश्यक त्या सुरक्षात्मक व अद्ययावत उपाययोजना तातडीने कराव्यात याबाबतही पालिकेतर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे.

या ठिकाणी अनधिकृत अथवा अतिरिक्त बांधकाम झाले असल्यास संबंधितास आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ अन्वये तसेच एमआरटीपी  कलम ५२ व ५३ अन्वये नोटीस देण्यात येत आहेत.