प्रशासकीय सेवेत येण्याचा माझा विचार नव्हता. मात्र वडिलांच्या इच्छेमुळे भारतीय प्रशासकीय सेवेत आलो. भावी आयुष्यात कोणत्या दिशेने मार्गक्रमण करायचे आहे त्याचा विचार नक्की करा, मात्र त्यापूर्वी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सिंघानिया शाळेतील विद्यार्थ्यांना दिला. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी महापालिका मुख्यालयात येऊन जयस्वाल यांची भेट घेतली. या वेळी आयुक्तांनीही या लहानग्यांसोबत संवाद साधला.या भेटीदरम्यान या विद्यार्थ्यांनी आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या संवादातील पहिला प्रश्न होता तुम्ही आयएएस कसे झालात? तुम्ही आधीच ठरवलं होतं का? या प्रश्नावर आयुक्तांनी विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा दिला. ‘‘भारतीय प्रशासकीय सेवेत येण्याचे माझे स्वप्न नव्हते. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी आयएएस बनावं.  प्रशासकीय सेवेत जावं. वडील हयात असेपर्यंत मी या गोष्टींचा कधी गांभीर्याने विचार केला नव्हता. पण माझे शालेय शिक्षण सुरू असतानाच वडिलांचं निधन झालं. त्या क्षणानंतर माझ्या डोक्यात वडिलांचे विचार घोळायला लागले. वडिलांचे स्वप्न डोळ्यांत उतरायला लागले आणि त्यादृष्टीने मी पाऊल उचलले, असे आयुक्तांनी या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले. एका विद्यार्थ्यांने विचारले की, शहरात अनेक समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी तुमचं काय नियोजन आहे, असा प्रश्नही एका विद्यार्थ्यांने या वेळी विचारला. त्यावर माझ्याकडे वेळ कमी आणि काम जास्त आहे, असे ते म्हणाले. कामाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. शहरात पार्किंग समस्या सोडविण्यासाठी बहुस्तरीय वाहनतळ सुविधा, फेरीवाल्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रभागनिहाय पर्यायी जागेची उपलब्धता, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ५ लक्ष वृक्ष लागवड करण्याचे धोरण आदी विषयांसह शहरातील रस्ते उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना वाहतूककोंडीवर काय उपाय योजणार आहात, असा सवाल केला असता जयस्वाल यांनी ही समस्या अतिशय मोठी आहे. सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग करा, असे आपण म्हणत असलो तरी तीही अपुरी आहे. ती सुधारण्याची आणि वाढविण्याचीही गरज आहे. आपण आज चालणे बंद केले आहे. त्यामुळे नजीकच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडी वापरण्याचा मोह टाळा, असा सल्लाही त्यांनी दिला.  विद्यार्थ्यांसाठी काय संदेश आहे यावर ‘तुम्ही तुमचं बालपण मस्त एन्जॉय करा, आई-वडिलांचे, शिक्षकांचे ऐका, स्वत:वर विश्वास ठेवा, आयुष्यात चांगला माणूस बना, कधीही खोटे बोलू नका, जशी आपण आपल्या घराची काळजी घेतो, तशीच काळजी आपल्या शहराची आणि देशाची घ्या,’ असा सल्ला दिला.