ऊन, वारा, पाऊस आणि दंगलीतही वृत्तपत्र विक्रेत्यांचे हात घराघरात पोहचत असतात. त्यांच्यामुळेच आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहत आहे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोपरी येथील राऊत शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दिनेश शेट्टी यांचा ‘पर्सन ऑफ दि इयर’ आणि पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचा विशेष संघटनात्मक योगदान या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, ठामपाचे स्थायी समिती सभापती संजय वाघुले, विरोधी पक्ष नेते संजय भोईर, वितरक बाजीराव दांगट, पराग दांगट आदी उपस्थित होते. ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात शेवटचा घटक म्हणजे वृत्तपत्र विक्रेता आहे. त्यांच्या मेहनतीवरच मीडिया नावाच्या सृष्टीचा उगम झाला आहे. मात्र, या घटकाला समाजाकडून हवे त्या पद्धतीने स्वीकारले जात नाही, हे दुर्दैव आहे. पेपरवाला पोऱ्या अशी ओळख असलेल्या या वंचित समूहाला पुढे आणणे गरजेचे आहे. मात्र, या व्यवसायातील माणसाला आमच्या सरकारने आणि आजच्या सरकारनेही फारसे महत्त्वच दिलेले नाही,’ अशी खंत आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली. ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी यांनी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाच्या १७ वर्षांच्या कारकिर्दीचा यावेळी आढावा घेतला.
या दिमाखदार सोहळ्यास ठाणे शहरातील ७०० वृत्तपत्र विक्रेते आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. या कौटुंबिक सोहळ्यात वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे सरचिटणीस अजित पाटील, कार्याध्यक्ष राजेश मोरे, उपाध्यक्ष शंकर दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली नंदू देशपांडे, राजू शेलार, रवी कर्डिले, नंदू कर्ले, सुशील मेहता, संजय बोराडे, केशव शिर्के, विलास पिंगळे, भास्कर ठावरे, अशोक कदम, अशोक यादव, सुभाष गुप्ता, संतोष खामकर, मोहन मोरे, गुरुनाथ चिंचोळे, ताजू शेख, चंद्रकांत पवार, फारुख बुखारी, संजय भुजबळ, भरत कुथे, सुभाष तायडे, जयेश पितळे, लीला कोकाटे, कुमार फडके, सखाराम चव्हाण, अरुण खोचाडे, स्मिता रहाटे, गजानन अंबाडे, अजित गिजे, सुदेश मेहता, मुन्ना माहिमी, गणेश कंक, मनीषा कदम, पाठकजी वशेष परिश्रम घेतले.