कार्यक्रम बेरंग होण्याची जाणकारांची भीती

पुढील महिन्यात शहरात होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपल्यालाही कार्यक्रम करण्याची संधी मिळावी, यासाठी कल्याण आणि डोंबिवली शहरातील बऱ्याच सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी उत्सुक असल्यामुळे एखाद्या शाळेच्या स्नेहसंमेलनाची अवकळा येईल  अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.

[jwplayer sHk0lrGQ]

डोंबिवली शहरातले स्नेहसंमेलन वेगळे आणि वैशिष्टय़पूर्ण असावे, भविष्यातील साहित्य संमेलनांसाठी ते दिशादर्शक ठरावे, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र हौशी कलावंतांमुळे ते प्रयत्न धुळीला मिळण्याची शक्यता आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला स्थानिक कलावंतांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. येत्या १० ते १५ जानेवारीदरम्यान त्याची रंगीत तालीमही आहे. मात्र या कार्यक्रमाच्या रूपरेषेबाबत स्थानिक कलावंत आणि समितीमध्ये कोणताही समन्वय दिसत नाही. समितीने सर्व कलाकरांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, तर आयोजक मात्र सर्व कलाकरांनी एकत्र घेऊन एखाद्या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करावा, असे मत मांडत आहेत. आयोजकांपैकी काहीजणांचा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या या अतिरेकाला विरोध आहे. त्यामुळे संमेलनाचा बेरंग होण्याची भीती ते व्यक्त करीत आहेत.

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक कलाकाराला यामध्ये आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, यासाठी कलाकार पहिल्यापासूनच आग्रही आहेत. मात्र सर्व कलाकारांनी वेगवेगळे कार्यक्रम करण्याऐवजी एखादी संकल्पना ठरवून एकत्र येत कार्यक्रम सादर करावा अशी सूचना ‘आगरी युथ फोरम’ने कलाकारांना बैठकी दरम्यान केली होती. गेल्या महिन्यात पार पडलेल्या या बैठकीनंतर सात सदस्यांची एक समिती सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नेमण्यात आली आहे. या समितीने कल्याण डोंबिवलीतील संस्थांशी संपर्क साधून त्यांना आपले कार्यक्रम सादर करण्यास सांगितले आहे.

[jwplayer atTxpXOQ]