कल्याणचे माजी आमदार व कल्याण-डोंबिवलीचे माजी महापौर हरिश्चंद्र पाटील यांचे रविवारी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या ४० वर्षांपासून हरिश्चंद्र पाटील कल्याण, डोंबिवलीच्या राजकारणात सक्रिय होते. सुरुवातीला पाटील शेतकरी कामगार पक्ष नंतर ते जनसंघ, भाजपमध्ये आले. मागील काही वर्षांपासून ते मनसेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. निवृत्तीकडे झुकल्यानंतर पाटील यांनी मुलगा हर्षद यांना पुढे आणले. कल्याण-शीळफाटा रस्ता रुंदीकरण, सावित्रीबाई रंगमंदिराची पायाभरणी, शिधावाटप कार्यालयाचे स्थलांतर, शहरात ज्येष्ठ नागरिक भवन उभारणे, पालिकेचे क्रीडा संकुल विकसित करणे, गोविंदवाडी रस्त्याचा पहिला प्रस्ताव यांसह अनेक नागरी विकासाची कामे करण्यात त्यांनी पुढाकार घेतला.