केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे डोंबिवलीत प्रतिपादन

देशाच्या विकासाचे चक्र बदलत चालले आहे. ‘मेक इन इंडिया’चा प्रयोग औद्योगिकीरणाचा एक भाग वाटत असला तरी या माध्यमातून शेती क्षेत्राला येणाऱ्या काळात खूप महत्त्व प्राप्त होणार आहे हे लक्षात घ्यायला हवे. शेतक ऱ्यांनी जमिनीच्या दरापेक्षा तळाच्या मूल्याचा विचार करावा. त्यामुळे जमिनी विकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असू नये. शेतीला जोडधंदा केला तर रोजगार, उत्पादन असे विकासाचे एक चक्र पूर्ण होईल. आपल्याला तूरडाळ, तेल आदी जिनसांसाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. ते बंद होण्यासाठी यापुढील काळात शेती अधिक विचारपूर्वक करायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय खत व रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात सुरू झालेल्या आगरी युथ फोरम आयोजित आगरी महोत्सवाला अहीर यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यात तसेच स्वातंत्र्य लढय़ात, गोवा मुक्ती लढय़ात आगरी समाजाने दिलेल्या योगदानाचा अहिर यांनी गौरवाने उल्लेख केला. कष्ट, मेहनतीने या समाजाने आपली श्रीमंती वाढवली आणि टिकवली आहे. आपली परंपरा आपल्या पुढच्या पीढीला कळण्यासाठी आगरी महोत्सवासारखे कार्यक्रम आयोजित करून संस्कृती, परंपरा जतन करणारा एक आदर्श समाज निर्माण करण्याचा युथ फोरमचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे अहिर म्हणाले. भूमी अधिग्रहण कायदा, प्रदूषणाविरोधात आपण नागपूर परिसरात प्रदीर्घ लढा दिला. शेतकरी, जमीन मालकांना जमिनी विकण्यापासून परावृत्त केले. याच जमिनींखाली आज कोळसा, लोखंडसारखी खनिज द्रव्ये मिळत आहेत, असे हंसराज अहिर यांनी सांगितले.

शिवसेनेचा बहिष्कार
आगरी महोत्सवाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचा एकही लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता. २७ गावे पालिकेतून वगळण्यावरून गेल्या तीन महिन्यांपासून शिवसेना आणि २७ गावांची संघर्ष समिती यांच्यात धुसफुस सुरू आहे. संघर्ष समितीने कार्यक्रमपत्रिकेवर शिवसेनेच्या सर्व नेत्यांची नावे प्रसिद्ध केली होती. परंतु, शिवसेनेला पालिका निवडणुकीत संघर्ष समितीने मागे टाकल्याने तो राग शिवसेनेने आगरी महोत्सवावर बहिष्कार टाकून यशस्वी केला असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी होती. आगरी युथ फोरम पदाधिकाऱ्यांनी मात्र आपण शिवसेनेच्या सर्व नेत्यांना आग्रहाची आमंत्रणे दिली होती, असे सांगितले.