नेवाळी फाटय़ावर शेतकऱ्यांचे झालेले हिंसक आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना ज्या प्रकारे बेदम मारहाण करण्यात आली, त्यावरून हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. भाल गावाजवळ आंदोलकांनी पोलिसांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली. पोलिसांच्या काठय़ा आणि शिरस्त्राणे काढून त्यांना मारहाण करण्यात आली, असे सिंग यांनी सांगितले. हा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. तसेच पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार दरबारी प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शांतता राखावी, असे आवाहनही या वेळी सिंग यांनी केले.