दोन्ही शहरांतील १७९ रस्त्यांचे रुंदीकरण; ग्रामीण भागाला प्राधान्य अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीचे शहर असा शिक्का बसलेल्या कल्याण डोंबिवलीतील तब्बल १७९ रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प महापालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी आखला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्मार्ट शहरांच्या यादीत नुकतीच कल्याण डोंबिवली शहरांची निवड करण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन येत्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने रस्ते रुंदीकरणाची मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली. येत्या शुक्रवारी आयुक्त ई. रवींद्रन डोंबिवलीतील रस्त्यांची पाहाणी करण्यासाठी येणार आहेत. कल्याण डोंबिवली हे शहर वाहतूक कोंडीने ग्रासलेले शहर आहे. त्यामुळेच महापालिका हद्दीतील १७९ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रकल्प आखण्यात आला आहे. यामध्ये कल्याण, टिटवाळा यांसारख्या शहरांमधील १३४ रस्त्यांचा समावेश आहे, तर डोंबिवलीतील ४५ रस्त्यांचा समावेश आहे. या नियोजित प्रकल्पात ग्रामीण भागाला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. दरम्यान, महापालिकेने जाहीर केलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या यादीत काही रस्त्यांचा स्पष्ट उल्लेख नाही. तेथील नागरिकांना केवळ जागा रिकाम्या करण्याच्या नोटिसा पालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. पालिकेची ही कारवाई नियमबाह्य़ असल्याचा आरोपही केला जात आहे. या रस्त्यांचा विस्तार * ग्रामीण भागातील घरडा सर्कल ते टाटा पॉवर, गांधीनगर जकात नाका ते सागांव शीळ रोड, काटई रोड, शीळ ते संदप रोड. कल्याण रोड ते जिमखाना रोड, खंबाळपाडा रोड, मॉडेल कॉलेज ते सिद्धिविनायक मंदिर रस्ते. * डोंबिवली शहरातील पश्चिमेतील रेती बंदर रेल्वे गेट ते कोपर दिवा वसई रेल्वे समांतर रस्ता, गरिबाचा वाडा ते रेतीबंदर, सुभाष रोड त्रिमूर्ती सोसायटी ते कोपर दिवा वसई रेल्वे समांतर रस्ता. कोंडीवर उतारा नाहीच यापूर्वी पालिकेने मानपाडा रोड, फडके रोड, बाजी प्रभू चौक, पश्चिमेतील स्टेशन रोड आदी रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे; परंतु येथील वाहतूक कोंडीची समस्या काही सुटलेली दिसत नाही. रस्त्यावर उभी केलेली वाहने, फेरीवाले यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत असून ती काही कमी होताना दिसत नाही.