जेवणानंतर ‘कुछ मीठा हो जाये’ असे म्हणणाऱ्यांसाठी विविध पर्याय आहेत. पण त्यातही आपली अशी खासियत निर्माण करणारे काही थोडेच. उल्हासनगर जसं उद्योगनगरीसाठी स्वत:ची ओळख जपून आहे तसेच तेथील खाद्यसंस्कृतीसाठीही नावाजलेलं आहे. याच उल्हासनगरची एक ओळख म्हणजे किशन स्वीट्स. नावातच गोडवा असणाऱ्या या दुकानात मिष्टान्न खाणाऱ्यांची इच्छा नक्कीच तृप्त होते.

जगप्रसिद्ध ब्रॅण्डच्या विविध उत्पादनांची बेमालूम नक्कल करून त्याची स्वस्त आवृत्ती काढण्यात उल्हासनगरची देशभर ख्याती आहे. त्याबद्दल कायम चेष्टेचा विषय बनलेल्या या उद्योगी नगरीची खाद्यसंस्कृती मात्र अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. दिवस-रात्र व्यापाऱ्यात मग्न असणारी येथील मंडळी कमालीची खाद्यशौकिन आहेत. शहरातील विविध भागांत असणारे खाण्याचे स्टॉल्स आपल्या खास चवीसाठी प्रसिद्ध आहेत. कॅम्प क्र. ३ मधील सतरा सेक्शन चौकातील किशन स्वीट्स त्यापैकी एक. एका छोटय़ाशा जागेत चंद्रू नडीगेर गेल्या पंधरा वर्षांपासून गोड पदार्थ बनवीत आहेत. जवळपास सर्वच समाजांत जेवल्यानंतर काही तरी गोड खाण्याची प्रथा आहे. सिंधीबहुल उल्हासनगरही त्याला अपवाद नाही. चंद्रू यांच्याकडे गोडाचे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

परिसरातील नागरिक जेवल्यानंतर बाहेर फेरफटका मारताना या ‘किशन स्वीट्स’ला भेट देऊन तोंड गोड करतात. अथवा घरी पार्सल घेऊन जातात. शिवाजी चौकापुढील सतरा सेक्शन चौकातून उल्हासनगर पूर्वेला जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या हाताला ‘किशन स्वीट्स’ आहे. गेली १५ वर्षे या छोटय़ाशा दुकानात चंद्रू नडीगेर गोड पदार्थ बनवून विकत आहेत. त्यात मोसमानुसार गाजर हलवा, रबडी, खरवस, गुलाबजामून या पदार्थाचा समावेश आहे. एका खासगी मिठाईच्या दुकानात काही वर्षे काम केल्यानंतर चंद्रू यांनी मिष्ठन्न बनवण्याची कला अवगत केली. असे कायम दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वत: मेहनत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कल्याणच्या दूध नाक्यावरून पहाटेच दूध आणण्यापासून चंद्रू यांचे गोड पदार्थ बनवण्याचे काम सुरू होते. चंद्रूच्या किशन स्वीट्समध्ये सर्वाधिक विकला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. डिसेंबर ते मार्च हा अस्सल गोड गाजरांचा हंगाम. त्यामुळे याच काळात सर्वात चांगला गाजर हलवा मिळू शकतो, असे चंद्रू सांगतात. सुका मेवा आणि मलई वापरून ‘किशन स्वीट्स’मध्ये गाजराचा हलवा तयार केला जातो. थंड अथवा गरम अशा दोन्ही वातावरणात ठेवून हा गाजराचा हलवा खाल्ला जाऊ  शकतो. अगदी शंभर ग्रॅमपासून दोन-पाच किलोपर्यंत गाजराचा हलवा इथे विकला जातो. अनेकदा मोठय़ा कार्यक्रमांसाठी आधी सांगून गाजराचा हलवा ग्राहक घेऊन जातात, असे चंद्रू सांगतात. मार्चनंतर मात्र गाजराचा हलवा विकणे बंद केले जाते. हलव्यास उपयुक्त गाजरांचा पुरवठा बंद झाल्याने उगाच ग्राहकांना साखरेच्या पाकात गाजर देणे योग्य नाही, असे चंद्रू सांगतात. गाजर हलव्यासोबतच येथील रबडी, मावा या पदार्थानाही चांगली मागणी आहे. खरवस आणि गुलाब जामूनसाठीही अनेक ग्राहक येत असतात. गुलाब जामूनमध्ये इथे तीन ते चार प्रकार आहेत. त्यात सुका मेवा, मावा, साधा, इलायची अशा गुलाम जामुनांचा समावेश आहे. फ्लेवर गुलाम जामून देण्याचाही माझा प्रयत्न असतो. सध्या प्रत्येक गोष्टीत फ्लेवर्स आले आहेत. त्यामुळे मागणीनुसार त्याचा वापर करावा लागत असल्याचेही चंद्रू सांगतात. येथील कोणताही गोड पदार्थ कमीत कमी वीस रुपयांना मिळतो. तसेच किलोवरही पदार्थाची विक्री केली जाते. संध्याकाळी साधारण पाच वाजता गोड पदार्थाची ही मैफल सुरू होते. थेट अकरा वाजेपर्यंत गोड पदार्थ खायला येथे खवय्ये येत असतात. एका दिवसात साधारण शंभर ते दीडशे ग्राहक येथे येत असतात. त्यात काही बडय़ा हस्तींचाही समावेश असल्याचे चंद्रू सांगतात. या गोड पदार्थामुळे अनेकांशी ऋणानुबंध तयार झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

किशन स्वीट्स

  • सतरा सेक्शन चौक, उल्हासनगर- ३
  • कधी :- दररोज, सायंकाळी ५ ते ११.