घाऊक बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक; पुरवठा वाढल्याने मेथी, शेपू, पालकच्या दरात घसरण पावसाने ओढ दिल्याने भाज्या महाग होण्याची भीती व्यक्त होत असताना गेल्या पंधरवडय़ापासून मुंबई, ठाणे परिसरात पालेभाज्यांची आवक दुपटीने वाढली आहे. त्यामुळे मेथी, पालक, शेपू यासारख्या भाज्यांचे टेम्पो, ट्रक भरून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये येऊ लागले आहेत. घाऊक बाजारात मेथीची जुडी सात रुपये, तर पालक तीन रुपये दरात विकले जात आहे. किरकोळ बाजारातही पालेभाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामुळे मेथीच्या जुडीचे किरकोळ बाजारातील दर १० ते १५ रुपये झाले आहेत. पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांमधून मुंबई तसेच ठाण्याच्या बाजारात भाजीपाल्याची मोठय़ा प्रमाणावर आवक होत असते. यंदा मात्र कमी पावसाचा फटका शेती उत्पादनात सकस मानल्या जाणाऱ्या या दोन जिल्ह्य़ांनाही बसतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुजरात तसेच मध्य प्रदेशातून येणाऱ्या भाज्यांवर मुंबईकरांची गुजराण सुरू असल्यासारखे चित्र होते. जानेवारी महिन्यात मुंबई, ठाण्याच्या दिशेने दर्जेदार अशी भाज्यांची आवक होते. त्यामुळे हा कालावधी स्वस्त भाज्यांसाठी ओळखला जातो. असे असताना जानेवारी महिन्याची सुरुवात झाली तरी पुणे, नाशिक जिल्ह्य़ांमधून पालेभाज्या तसेच इतर भाज्यांची आवक तुलनेने कमी असल्याचे चित्र होते. पुणे जिल्ह्य़ातून मुंबईत येणाऱ्या पालेभाज्यांचा दर्जाही घसरला असल्याच्या तक्रारी होत्या. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून राज्यभर पसरलेल्या गुलाबी थंडीमुळे मात्र हे चित्र बदलू लागले असून अनुकूल हवामानामुळे मुंबई, ठाण्याच्या बाजारांमध्ये पालेभाज्यांची स्वस्ताई अनुभवयास मिळू लागली आहे. गेल्या पंधरवडय़ापासून भेंडी, टॉमेटो या एरव्ही चढय़ा दरात विकल्या जाणाऱ्या भाज्यांची आवकही चांगली असून सर्वाधिक आवक मेथी, शेपू आणि पालक या पालेभाज्यांची होत आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी दिली. आवक वाढल्याने घाऊक बाजारात पालकची एक जुडी तीन रुपयांना, तर मेथी सात रुपये या दराने विकली जात आहे. शेपूचे दरही ३ रुपयांच्या आसपास आहेत. किरकोळ बाजारात एरव्ही २० ते २५ रुपयांनी विकली जाणारी मेथीची जुडी १२ ते १५ रुपयांना मिळत आहे, असे ठाण्यातील किरकोळ व्यापारी अभंग चव्हाण यांनी दिली. जानेवारी-फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पालेभाज्यांचे दर कमीच असतात, असा दावाही चव्हाण यांनी केला. एपीएमसी बाजारात मेथी (७०० क्विंटल), पालक (४०० क्विंटल), शेपू (३०० क्विंटल) या भाज्यांची सर्वाधिक आवक होत आहे.