‘लोकसत्ता’ आयोजित ‘आरोग्यमान भव’ परिसंवाद ठाण्यात

निरोगी आयुष्य ही काही एका दिवसात मिळवण्याची बाब नाही. आहाराच्या आणि जीवनशैलीच्या योग्य सवयी लावून घेतल्या की आरोग्याच्या अर्ध्याअधिक समस्या आटोक्यात येतात. या सवयी नेमक्या कोणत्या, त्यांची अंमलबजावणी कशी करावी, शरीरासोबतच मनाचे आरोग्य कसे जपावे याचा सल्ला लोकसत्ता आरोग्यमान भव या परिसंवादामध्ये दिला जाणार आहे. येत्या शुक्रवारी व शनिवारी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत ठाणे येथे हा परिसंवाद होईल. कुटुंबातील सर्वाचे करताना स्वतकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याबाबतही या परिसंवादात मार्गदर्शन केले जाईल.

शरीर व मनाने कुरकुर सुरू केली की आरोग्याचे महत्त्व लक्षात येते. त्यानंतर आरोग्य जपण्याबाबत ओळखीच्या लोकांकडून सल्ले मिळणेही सुरू होते. यातील नेमके कोणते सल्ले ऐकावेत आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते अमलात कसे आणावेत याबद्दल मनात शंका असतात. या शंका थेट संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना विचारण्याची संधी या परिसंवादातून प्रेक्षकांना मिळेल. आरोग्य जपण्यासाठी त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक आहे. समाजाच्या आरोग्याविषयीच्या बदलत्या गरजांचे भान ठेवून ‘आरोग्यमान भव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हृदयाचा मार्ग जसा पोटातून जातो तसाच निरोगी आयुष्याचा मार्गही पोटातूनच जातो. उदरभरण नोहे.. हे माहीत असले तरी जीभेचे लाड पुरवण्याच्या नादात त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. मात्र आयुर्वेदात आहार व जीवनशैलीला अत्यंत महत्त्व देण्यात आले असून हा ‘उदर-मतवाद’ समजून घेतला की अनेक समस्या परस्पर सुटतात. वैद्य अश्विन सावंत हा उदर-मतवाद समजावून देतील. शारीरिक व मानसिक या दोन्ही पातळ्यांवर निरोगी आयुष्य जगण्यासाठी जीवनशैलीत सकारात्मक बदल करावे लागतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी उतार-चढाव येतात. या घटनांकडे कसे पाहावे, मानसिक समतोल कसा ठेवावा याबाबत केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. शुभांगी पारकर ‘जगू आनंदे’चा मंत्र देणार आहेत.

कुटुंबातील सर्वाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या स्त्रियांनीही स्वतची काळजी घेण्याची गरज आहे. किशोरीवयापासून वृद्धापकाळापर्यंत स्त्रियांच्या शरीरात कोणते व का बदल होतात हे लक्षात घेतले की स्त्रियांच्या दुखण्याचे मर्म उलगडते. स्त्रीआरोग्याच्या क्षेत्रात ३५ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या डॉ. रेखा डावर या कुटुंबाच्या आरोग्याची दोरी सांभाळणाऱ्या स्त्रियांना स्वतच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत सल्ले देतील.

माधवबाग प्रस्तुत लोकसत्ता ‘आरोग्यमान भव’ हा कार्यक्रम पॉवर्ड बाय तन्वी, पितांबरी, शीतल हर्बल आणि नाना एंटरप्रायझेस असून या कार्यक्रमाला हेल्थ पार्टनर एसआरव्ही ममता रुग्णालय, बँकिंग पार्टनर डीएनएस बँक, पॉवर्ड बाय पार्टनर शीतल हर्बल आणि हॉस्पिटल पार्टनर ज्युपिटर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभले आहे.

ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे शुक्रवारी व शनिवारी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत होणाऱ्या या परिसंवादासाठी ३० रुपये प्रति व्यक्ती असे शुल्क आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सोमवारपासून उपलब्ध होतील. प्रवेशिकांसाठी लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) किंवा टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, ठाणे (प.) येथे संपर्क साधावा.

’ कधी? : १५ व १६ सप्टेंबर (सकाळी १० ते दुपारी ३)

’ कुठे? : टिपटॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (प.)

*     जगू आनंदे

डॉ. शुभांगी पारकर

केईएम रुग्णालयाच्या

मानसोपचार विभाग प्रमुख

*     उदर मतवाद

वैद्य अश्विन सावंत

आयुर्वेद तज्ज्ञ

*      जिच्या हाती

    आरोग्याची दोरी

डॉ. रेखा डावर

स्त्रीरोगतज्ज्ञ