सातबारावरील बोगस नोंद कायम; वारसांचा सत्कार स्वीकारण्यास नकार उरण तालुक्यातील चिरनेर सत्याग्रहात हुतात्मा ठरलेल्या हसुराम बुधाजी घरत यांच्या वारसांना दिलेल्या इनामी जमिनीच्या सातबाऱ्यावर तब्बल ५९ वर्षांनंतर झालेली बोगस वारस नोंद खोटी असल्याचे सिद्ध होऊनही अद्याप चुकीचे नाव रद्द झालेले नाही. त्यामुळे येत्या रविवारी २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या हुतात्मा दिन सोहळ्यात होणारा सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्या वारसांनी घेतला आहे. हुतात्मांचे वारसदार नारायण घरत निरक्षर असल्याने तत्कालीन सरकारने त्यांना तालुक्यातील घरखोशी येथे इनाम म्हणून मिळालेली ३८ गुंठे जमीन स्थानिक काँग्रेस कमिटीचे सदस्य वसंत माधव वेदक यांच्या नावे केली. त्यांचा कोणताही वारस आता जीवित नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणीही जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र, तब्बल ५९ वर्षांनंतर या इनामी जमिनीच्या सातबाऱ्यात फेरफार करून वसंत महादेव वेदक हे नाव नोंदवले गेले. विशेष म्हणजे, ही वारसनोंद करताना तत्कालीन तहसीलदारांनी जमिनीचे कब्जेदार असणाऱ्या घरत कुटुंबीयांना अंधारात ठेवले. गेली दोन वर्षे ‘लोकसत्ता'ने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर या बोगस वारसदारांची नावे वगळण्यातही आली. मात्र, मूळ दुखणे म्हणजे ‘वसंत महादेव वेदक' हे बोगस नाव मात्र कायम ठेवले आहे. त्यामुळे पूर्वजांना इनाम म्हणून मिळालेल्या जमिनीवर हक्क शाबीत करण्यासाठी गेली काही वर्षे सातत्याने सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजविणारे घरत कुटुंबीयांनी रविवारी हुतात्मा दिनी होणारा सत्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विजय घरत यांनी दिली. पाश्र्वभूमी २५ सप्टेंबर १९३० रोजी उरण तालुक्यातील चिरनेर येथे परिसरातील ८४ गावांमधील शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या सत्याग्रह केले. त्यातील आठ शेतकऱ्यांनी हौतात्म पत्करले. स्वातंत्र्यानंतर १९५७ मध्ये शासनाने उरण तालुक्यातील सावकारांकडे असलेली अतिरिक्त जमीन संपादित करून ती हुतात्म्यांच्या वारसांना इनाम म्हणून दिली.