निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या मागे उभा राहणाऱ्या मुस्लीम समाजाची मते यंदा आपल्या पक्षाकडे कशी वळविता येतील या दृष्टीने ‘एमआयएम’च्या पदाधिकाऱ्यांनी मुस्लीमबहुल प्रभागांमध्ये जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसचे अस्तित्व नगण्य आहे. इतकी वर्षे काँग्रेसची पाठराखण करीत असलेल्या मुस्लीम समाजाची मते आपल्याकडे वळावीत यासाठी एमआयएमच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले असून या समाजाच्या मुहल्ल्यांमध्ये बैठकांचा धडाका लावण्यात आला आहे.
कल्याणमधील गफूरडोन चौक, गोविंदवाडी, रोहिदास वाडा, बैलबाजार, अशोकनगर, कचोरे या प्रभागात ‘एमआयएम’ने आपले लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांना महापालिका निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आले आहे. ठाण्याहून संजय चौपाने यांच्यासारख्या नेत्यांना येथे आयात करण्यात आले आहे. काँग्रेसचे काही दिग्गज नगरसेवक अलीकडेच शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे काँग्रेसला आणखी हादरा बसला आहे. सचिन पोटे यांचेही नगरसेवकपद आणि उमेदवारी अर्ज बेकायदा बांधकामांचे संरक्षण केल्यामुळे बाद झाला आहे. त्यामुळे काँग्रेस गोत्यात आली आहे.
बाजारपेठ, रेतीबंदर परिसरात राहणारा पारंपरिक मुस्लीम रहिवासी अनेक वर्षांपासून या प्रभागांमध्ये पुरेशा नागरी सुविधा मिळत नसल्याने नाराज असल्याने ही मते एमआयएमकडे वळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षाचे हैदराबादसह देशभरात जे काम सुरू आहे. त्या बळावर आम्ही मते मागत आहोत. काँग्रेसची मते फोडण्याची किंवा ती मागण्याची आम्हाला गरजच नाही.
-अजिज मौलवी, एमआयएम