४२ पैकी १८ बसमध्ये बिघाड; अनेक बसची चाके खराब एकीकडे मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेने वातानुकूलित बससेवा सुरू केली असताना दुसरीकडे याच ताफ्यातील ४२ नव्या बसपैकी १८ बस नादुरुस्त अवस्थेत बस आगारातच उभ्या असल्याची बाब समोर आली आहे. काही बसचे टायर खराब झाले आहेत, तर काही बसमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून महापालिकेला ४२ बस प्राप्त झाल्या आहेत. या बस येऊन सहा महिनेदेखील उलटले नाहीत, तोच यातील १८ बस नादुरुस्त असल्याने मीरा रोड येथील बस आगारातच उभ्या आहेत. अवघ्या सहा महिन्यांच्या अवधीत बसची अशी अवस्था झाल्याने या बसच्या दर्जापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुसरीकडे तब्बल ८० लाख रुपये खर्च करून तयार केलेल्या मीरा रोड येथील प्लेझंट पार्क परिसरात तयार करण्यात आलेल्या बस आगाराचीही दुरवस्था झाली आहे. बसस्थानकाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याने या ठिकाणी बस उभ्या करणे अशक्य झाले आहे. काही बसचे टायर खराब झाले आहेत. बस रस्त्यावर धावण्यास सुरुवात होऊन सहा महिने उलटले नाहीत, तोच टायर खराब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या १८ बससाठी नेमण्यात आलेले चालक व वाहक यांना त्यामुळे सध्या कोणतेही काम नसल्याने ते केवळ बसून आहेत. महापालिकेकडे पक्क्या स्वरूपाचे बसस्थानक नसल्याने मीरा रोडच्या प्लेझंट पार्क येथे तात्पुरत्या स्वरूपाचे बसस्थानक बांधण्यात आले आहे. परंतु त्याचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. बसस्थानकासाठी करण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा कोबा पूर्णपणे उखडून गेला आहे. सध्या स्थानकात बस दुरुस्त करणे अशक्य झाले असून बसदेखील चिखलातच उभ्या करून ठेवाव्या लागत आहेत. बसगाडय़ा दररोज सरासरी २०० किलोमीटर धावत असल्याने टायर खराब झाले आहेत. नवीन टायर मागविण्यात आले आहेत. नादुरुस्त गाडय़ांची दुरुस्ती करून त्या लवकरच रस्त्यावर उतरविण्यात येतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी परिवहन सेवेच्या बसच्या अवस्थेबाबत काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद सावंत यांनी महासभेत प्रशासनाला जाब विचारला, परंतु त्यावर प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची राज्य सरकारकडे तक्रार करण्यात येणार असून सीआयडीमार्फत चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले.