नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला; दर्जावर प्रश्नचिन्ह नायगाव रेल्वेमार्गावरून पूर्व-पश्चिमेस जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू असताना काही भाग कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या दर्जाबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाचे बांधकाम निकृष्ट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वसई-मुंबई हे अंतर कमी व्हावे आणि नागरिकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी नायगाव रेल्वे मार्गावर पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल असावा, अशी मागणी वसई-विरारचे रहिवासी अनेक वर्षांपासून करत आहेत. त्यासाठी अनेक अडचणी पार करत हा उड्डाणपूल बांधण्यास शासनातर्फे मंजुरी मिळाली होती. अनेक अडथळ्यांनंतर मंजुरी मिळालेल्या या पुलाचे काम २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. या पुलासाठी मुंबई महानगरविकास प्राधिकरणामार्फत ५६ कोटी २५ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. हा उड्डाणपूल झाल्यास वसई-मुंबई हे अंतर २५ किलोमीटरने कमी होणार आहे. उड्डाणपुलाचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय वेगाने सुरू होते. अशामध्येच गुरुवारी सकाळी नायगाव पश्चिमेकडे बांधकाम सुरू असलेल्या या उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याने येथील नागरिकांत असंतोष पसरला असून कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या या उड्डाणपुलाचे काम सुरू होऊन २ वर्षे झाली. गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान पुलाच्या दोन बिमना जोडणारा मधला भाग खाली पडला. यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, तरी अशा पद्धतीचे बांधकाम होत राहिले तर भविष्यात मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणी ठेकेदाराची चौकशी व्हावी. उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी कोणत्या प्रकारचे सिमेंट, खडी वापरली, बांधकामाची पद्धत कशा प्रकारची आहे, याची सखोल चौकशी व्हावी. शेवटी नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. - मायकल फुटर्य़ाडो, काँग्रेस ‘एमएमआरडीए’मार्फत सुरू असलेल्या या उड्डाणपुलाचे काम सुरळीत सुरू होते. कामगारांमार्फत या पुलाच्या बांधकामाचे योग्य पद्धतीने फीटिंग केले आहे. त्यामुळे या कामाचा दर्जा निकृष्ट आहे की नाही हा प्रश्नच येत नाही. - कन्हैया भोईर, नगरसेवक नायगाव पश्चिमेकडून सकाळच्या वेळेत प्रवास करीत असताना नायगाव येथील उड्डाणपुलाचे बांधकाम कोसळले. सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी या घटनेची पूर्णत: चौकशी करावी, जेणेकरून सामान्य जनतेला न्याय मिळेल. - स्वप्निल परेरा, स्थानिक