२७ गावांना भीषण टंचाईच्या झळा २७ गावांच्या हद्दीत भीषण पाणी टंचाई भेडसावत असताना याच गावातील लोढा हेवन परिसरातील निळजे गावात मात्र काही दिवसांपासून नळांना २४ तास पाणी येत असल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वी फक्त दिवसभरात सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास अशा प्रकारे पाणीपुरवठा होत होता. गावात अनेक ठिकाणी सार्वजनिक नळकोंडाळे आहेत. त्यांना नळ नाहीत. काही नळ जोडण्यांना मोठय़ा प्रमाणात गळती आहे. चोवीस तास पाणीपुरवठा चालू राहत असल्याने हे सगळे पाणी गावातील रस्त्यावर साचून राहते. कल्याण शिळफाटा रस्त्याला खेटून आणि लोढा हेवन परिसरात निळजे गाव आहे. या गावाला इतर २७ गावांप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून दिवसातून चार तास पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याने नळ काढून थेट पाणी भरले जाते. सार्वजनिक ठिकाणचे नळही या कारणासाठीच काढून टाकण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी गावात टाकलेल्या नळजोडण्या पालिकेकडून दुरुस्त करण्यात येत नसल्याने त्या गळक्या झाल्या आहेत. काही ठिकाणी नळ जोडण्यांवरून वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या वाहिन्यांच्या ठिकाणी पाण्याची गळती सुरू असते. यापूर्वी गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नळ वाहिनीला नळ बसविणे, नळ जोडण्या दुरुस्ती करण्याची कामे ग्रामस्थांकडून किंवा पालिकेकडून प्राधान्याने करण्यात आली नाहीत. गेल्या काही दिवसांपासून निळजे गावाला २४ तास पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे येणारे पाणी गळक्या वाहिन्यांमधून गळत आहे. त्यामुळे रस्त्यावर तळी साचत आहेत. अनेक घरांच्या समोर जोडण्यांना नळ नाहीत. त्यामुळे हे येणारे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे निळजे गावात प्रवेश करताच, दारोदारी, रस्त्यावर पाण्याची तळी साचल्याचे दृश्य दिसत आहे. एका धनाढय़ विकासकाचे गृहसंकुल, त्याची वेगवान कामे या भागात सुरू आहेत. त्यासाठी एमआयडीसीकडून हा पाणीपुरवठा होत असावा आणि त्याचा लाभ आमच्या गावाला होत असावा अशी शंका निळजेच्या रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. गावांना पाणीपुरवठा करणे इतकेच आमच्या हाती आहे. त्या पुढील नियोजन कल्याण-डोंबिवली पालिकेने करणे गरजेचे आहे. गावात पाणी का साचतेय हा विषय कडोंमपाच्या अखत्यारीत येतो. संजय कुंभार, उपअभियंता, एमआयडीसी २७ गावांच्या पाणीपुरवठय़ावर एमआयडीसीचे नियंत्रण आहे. त्यामुळे रोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र २४ तास पाणीपुरवठा होत असेल तर त्याचे कारण पाहावे लागेल. पाण्याची गळती होत असेल तर ते तपासण्यात येईल. राजीव पाठक, कार्यकारी अभियंता, कडोंमपा निळजे परिसरातील लोकवस्ती वाढली आहे. या पूर्वी सकाळ-संध्याकाळ असा फक्त दोन तास पाणीपुरवठा होता. हे पाणी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मिळत नव्हते. त्यामुळे प्रत्येक भागाला किमान पाणी मिळाले पाहिजे. म्हणून दिवसभर ठरावीक वेळेने पाणीपुरवठा केला जात आहे. गावात पाणी साचत नाही. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होतो. फक्त तिथेच हा प्रकार होतो. -प्रभाकर जाधव, नगरसेवक.