समर्थाचा दासबोध म्हणजे आखीव, रेखीव अशी मांडणी आहे. मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात तुम्हाला मिळतात. संत नामदेव, तुकाराम यांचे शब्द मधूर आहेत. समर्थाची भाषाशैली मात्र वेगळी आहे. कारण समर्थाच्या समोर रुढी, परंपरेच्या, बेशिस्त, बेदिलीचा कातळ होता. तो कातळ फोडण्यासाठी त्यांनी धबधब्यासारखी प्रवाही शब्दरचना वापरली, असे प्रतिपादन संस्कृत साहित्याच्या अभ्यासिका, निवेदिका धनश्री लेले यांनी केले. ‘चतुरंग' संस्थेच्या डोंबिवली शाखेच्या २९ व्या वर्धापनदिनानिमित्त मुक्तसंध्या या उपक्रमाचे आयोजन रविवारी येथील सुयोग सभागृहात करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत ‘दासबोधातील सौंदर्यस्थळे' या विषयावर धनश्री लेले यांनी आपली निरीक्षणे नोंदवली. त्यांनी आपल्या चपखल वाणीने समर्थाच्या दासबोधातील एक एक पैलू विविध संदर्भातून उलगडले. यामुळे दासबोधातील सौंदर्यस्थळांचा उलगडा प्रेक्षकांना झाला. प्रेक्षकांनीही हे व्याख्यान ऐकण्यासाठी सभागृहात एकच गर्दी केली होती. धनश्री लेले पुढे म्हणाल्या, समर्थाचा काळ हा मुघलांच्या आक्रमणाचा खडतर काळ होता. त्यामुळे मधुर वाणीद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करणे योग्य नव्हते. त्यामुळे दासबोधाची भाषा ही इतर ग्रंथापेक्षा वेगळी असल्याचे त्या सांगतात. समर्थ बंडखोर नव्हते, फटकून वागणारे नव्हते. यामुळे दासबोधात त्यांनी कुणावरही टीका केलेली आढळत नाही. अध्यात्मावर आधारीत असलेल्या इतर ग्रंथात तुम्हाला टीका टिपणी आढळतील, मात्र दासबोधात तक्रारीचा सूर नाही. माणसाच्या मुर्खपणाची लक्षणे दासबोधात ७२ ओव्यांमध्ये सांगण्यात आली आहेत.