निसर्गप्रेमींचा संकल्प; ‘भागीरथी’ची रविवारपासून स्वच्छता धबधबा परिसरात पडणारा पाऊस आणि कोसळणाऱ्या धबधब्याखाली चिंब भिजून त्यातून मिळणारा आनंद लुटायला सगळ्यांनाच आवडतो. मात्र, हा आनंद लुटताना धबधब्यांवर कचऱ्याचे ढीग तयार होऊन त्याचे सौंदर्याला बाधा येते आहे. हे सौंदर्य अबाधित राहावे यासाठी हा परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी कल्याण, डोंबिवलीतील साद फाऊंडेशन या संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच शुभारंभ म्हणून भागीरथी धबधबा परिसराची स्वच्छता करण्याची मोहीम येत्या रविवारपासून सुरू करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी धबधबे, रानवाटा, डोंगरदऱ्या, धरणक्षेत्र, गड-किल्ले आदी नैसर्गिक ठिकाणे पाहावयास मिळतात. पावसाळ्यात बहरलेल्या या निसर्गरम्य ठिकाणांकडे पर्यटकांची पावले आपोआप वळतात. ठाणे जिल्ह्य़ात बदलापूर स्थानकाच्या पुढे असलेल्या वांगणी परिसरात अनेक धबधबे सध्या पर्यटकांना खुणावत आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांना शहरापासून थोडे दूर, परंतु वाहतुकीसाठी सोयीचे असे हे ठिकाण असल्याने दरवर्षी पर्यटक येथे गर्दी करतात. सहलीचा आनंद लुटल्यानंतर पर्यटक ज्यावेळी परतीचा प्रवास करतात. त्यावेळी मागे प्लॅस्टिकच्या पिशव्या, काचेच्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या, जेवणासाठी आणलेल्या वस्तू टाकून जातात. परंतु असे करण्यामुळे निसर्गसौंदर्याला बाधा पोहोचत आहे याचे भान मात्र या पर्यटकांना राहत नाही. त्यासाठी हाच का आपला आनंद आणि हेच का आपले निसर्गप्रेम हे दाखवीत चला नवा विचार करूया अशी साद घालत साद फाऊंडेशनने येत्या रविवारपासून स्वच्छतेचा हा नवा उपकम हाती घेतला आहे. पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच स्वच्छता राखणे हे आपलेही कर्तव्य आहे. या सामाजिक भावनेतून अनिकेत चांदुरे, स्वप्निल शिरसाट व अविनाश पाटील या तरुणांनी हा पुढाकार घेतला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पुढे वांगणी स्थानक आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात स्थानकापासून हाकेच्या अंतरावर बिडीस गाव आहे. याच गावात भागीरथी धबधबा आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे येतात. पर्यावरणाचा आनंद घेतात. मात्र मागे निसर्ग प्रदूषित करणारा कचरा टाकून जातात. परिसर स्वच्छ राखणे आणि त्याविषयी जनजागृती करण्याचे काम संस्थेने हाती घेतल्याचे अविनाश पाटील यांनी सांगितले. मोहिमेत सहभागी होण्यासाठी.. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी वागंणी स्टेशन तिकीट खिडकीजवळ ३१ जुलैला सकाळी ८ वाजता जमावे. मोहीम सकाळी ९ ते ११ या वेळेत चालणार आहे. वांगणी स्टेशनवरून धबधब्यावर जाण्यास रिक्षा उपलब्ध आहेत, त्यासाठी प्रत्येकी २० रुपये लागतात. संपर्क - स्वप्निल शिरसाठ - ७६६६६८६८६०, अनिकेत चांदुरे - ९७७३४०७७८१, अविनाश पाटील - ८०८०१७१४३०