पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर मिठावरील आवरणे हटवली; व्यापारी मीठ संकलित करण्यासाठी वसईत दाखल

पावसाळ्यात झाकून ठेवलेली वसईतील मिठागरे ‘ऑक्टोबर हीट’ सुरू झाल्यामुळे खुली झाली असून अनेक व्यापारी मीठ संकलित करण्यासाठी वसईमध्ये दाखल झाले आहेत.

पावसाळ्याच्या काळात मीठ सर्वत्र गवताने झाकून ठेवले जाते. साधारण तीन महिन्यांनंतर हे मीठ खुले करण्यात येते. पालघर जिल्ह्य़ातील वसई-डहाणू पट्टय़ात १५ हजार एकर जागेवर मिठाचे उत्पादन होते. यातील अर्धी जागा राज्य सरकारची, तर अर्धी केंद्र सरकारच्या मालकीची असते. वसईतील स्थानिक भूमिपुत्र हे या मिठाचे उत्पन्न घेऊन आपली उपजीविका करत असतात. एकूण पाच हजाराच्या आसपास कुटुंबे या व्यवसायावर आपली उपजीविका करतात.

वसई-विरारमधल्या १७०० एकर जागेवर नीट उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षांत मिठागर व्यावसायिकांना अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

उत्पादकांना तोटा

वसईच्या मीठ उत्पादकांना एक किलो मीठ उत्पादन करण्यासाठी १ रुपया ४० पैसे खर्च होतो. परंतु त्यांना १ रुपये १० पैसे दराने मीठ विकावे लागते. हेच मीठ नंतर बाजारात १६ ते १८ रुपये किलोने विकले जाते. एक टन मीठ उत्पादन करण्यास १४०० रुपये खर्च येतो, परंतु व्यापाऱ्यांना हेच मीठ १२०० रुपयांना विकावे लागते.

एके काळी मोठय़ा प्रमाणात असलेला हा उद्योग आता वसई भागात कमी होऊ  लागला आहे. इमारतीचे सांडपाणी, नाल्यातील सांडपाणी, रासायनिक सांडपाणी थेट खाडीत सोडले जाते. त्यामुळे मीठ आगारातील पाण्यावर परिणाम होऊन अपेक्षित मीठ घटू लागले आहे. त्यामुळे काही मिठागरे बंद करण्यात आली. दूषित पाण्यामुळे मिठावरच नव्हे, तर माशांवरही परिणाम झालेला आहे.

– मदन किणी, राज्य मीठ उत्पादक संघ.