समीरा गुजर हे नाव घतले की समस्त ठाणेकर लगेच ‘ही तर आमच्या ठाण्याची’ असे उद्गार काढतील. महाराष्ट्र विद्यालय, ब्राह्मण विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेली समीरा गुजर आता अभिनयाबरोबरच निवेदिका आणि सूत्रसंचालक म्हणून सर्व रसिकांना ठाऊक आहे. ‘टुरटूर’ आणि ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ ही दोन नाटकांमधून व्यावसायिक रंगभूमीवर समीराने काम केले आहे. ‘आभाळमाया’ या मालिकेतून ती झळकली होती. सध्या सह्य़ाद्री वाहिनीवरील ‘यंग तरंग’ या कार्यक्रमाचे निवेदन-सूत्रसंचालन करताना आपण तिला पाहतोय. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’,‘सासूची माया’ यांसारखे काही चित्रपटही तिने केले आहेत. सध्या ‘मी उद्योजक होणारच’, नंदेश उमप यांच्या ‘मी मराठी’ या जाहीर कार्यक्रमांचे लेखन आणि सूत्रसंचालन ती करतेय. समीरा गुजर, अभिनेत्री ’आवडते मराठी चित्रपट - ‘श्वास’, ‘पिंजरा’, ‘तू तिथं मी’ ’आवडते हिंदी चित्रपट - ‘जंजीर’, ‘अंदाज अपना अपना’, ‘थ्री इडियट्स’ ’आवडती नाटकं - ‘प्रेमा तुझा रंग कसा’, वीरेंद्र प्रधान यांनी ‘घरोघरी’, सई परांजपे लिखित ‘काय झाली गंमत’ ’आवडते अभिनेते - बलराज सहानी, अमिताभ बच्चन ’आवडत्या अभिनेत्री - नूतन, वहिदा रहमान, स्मिता पाटील ’आवडते दिग्दर्शक - हेमंत देवधर, वीरेंद्र प्रधान, पंडिता रमाबाई ’आवडते निवेदक - भाऊ मराठे, सुधीर गाडगीळ, मंगला खाडिलकर, धनश्री लेले ’आवडते लेखक/नाटककार - रत्नाकर मतकरी, भास, विशाखादत्त ’आवडलेल्या भूमिका - काव्यात्मक, वीज म्हणाली धरतीला मधील जुलेखा, मीराबाई ’आवडलेली पुस्तकं - दुर्गा भागवत यांचे कुठलेही पुस्तक, शांता शेळके, स्त्री लेखिका, माधुरी शानभाग लेखकाशी नातं निर्माण व्हायला लागतं. ’आवडते सहकलावंत - विक्रम गोखले, सुहास जोशी ’आवडता खाद्यपदार्थ - शेवपुरी ’आवडता फूडजॉईण्ट - ‘आमंत्रण’मधील मिसळ ’आवडतं हॉटेल - हॉटेल शिवाप्रसाद ’ठाण्याविषयी थोडेसे मुळात डोंबिवलीहून ठाण्याला राहायला येण्याचा निर्णय माझ्या बाबांनी घेतला तोच मुळी इथले सांस्कृतिक वातावरण कुटुंबाला मिळावे म्हणून. शाळेत शिकत असताना बालकलाकार म्हणून एकांकिकांमधून काम करण्याबरोबरच विविध शिबिरांमधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यास ठाणे शहर, गडकरी रंगायतनची वास्तू, ठाण्यात भेटलेल्या अनेक महनीय, दिग्गज व्यक्ती, मला मिळालेले सांस्कृतिक वातावरण यांचा मोठा वाटा आहे. सातवी ते दहावीत शिकत असताना जिज्ञासा या सुरेंद्र दिघे यांच्या संस्थेत दाखल झाले. त्यानिमित्ताने अनिल अवचट, अरुण देशपांडे, डॉ. आनंद नाडकर्णी अनेकांशी नाते जुळले. वेध परिषदेचे दुसरे किंवा तिसरे वर्ष होते, तेव्हा मला तुषार दळवी यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे माझी आतापर्यंत जी काही थोडीबहुत वाटचाल झाली आहे ती केवळ मी ठाण्यात राहायला आले, त्यामुळेच शक्य झाले आहे. ठाण्याचे हे ऋण कायम मनात राहील. आजच्या ठाणे शहराबद्दल सांगायचे तर वाहतुकीची समस्या प्रचंड गंभीर असून त्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी असे वाटते. शांतता न मिळण्याचा सांस्कृतिक आरोग्यावरही परिणाम होतोय असे वाटते. शब्दांकन - सुनील नांदगावकर