समरसता साहित्य संमेलनात ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांचे प्रतिपादन अखंड हिंदुस्थानात हिंदू-मुस्लीम समाज एकत्र राहणार नाही, याची पूर्वकल्पना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना होती. इंग्रज देश सोडून निघून गेल्यानंतर या देशात जी यादवी माजेल; ती कशी नियंत्रणात आणायची हाही विचार आंबेडकर यांना सतावत होता. भारतातून इंग्रजांना हिसकावून लावण्याच्या काँग्रेसच्या धोरणापेक्षा फाळणी किती महत्त्वाची आहे हे त्यांना ज्ञात होते. त्यामुळे स्वातंत्र्यलढय़ात प्रत्यक्ष सहभागी होण्यापेक्षा आंबेडकरांनी फाळणीला महत्त्व दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे कार्य राष्ट्रउभारणीसाठी खूप मोलाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक शेषराव मोरे यांनी रविवारी येथे केले. समरसता साहित्य परिषदेतर्फे १७ समरसता साहित्य संमेलन कल्याण पूर्वेत आयोजित करण्यात आले. या वेळी उद्घाटनाच्या कार्यक्रमात शेषराव मोरे बोलत होते. या संमेलनाला संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, स्वागताध्यक्ष आमदार गणपत गायकवाड, प्रा. रमेश महाजन, प्रा. तानाजी सहाणे उपस्थित होते. संमेलनापूर्वी शहरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. आंबेडकर हे कसे फक्त दलितोद्धारक नेते होते आणि त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात सहभागी न होऊन कसा देशद्रोह केला, या विषयावर अनेक वर्षे मंथन सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये एक संभ्रम आहे. तो दूर करण्याचा कधीच कोणी प्रयत्न करीत नाही, अशी खंत मोरे यांनी व्यक्त केली. ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ या ग्रंथात आंबेडकरांनी फाळणीचे महत्त्व स्पष्टपणे मांडले आहे. फाळणी झाली नसती तर, राज्यघटनेची निर्मिती, निधर्मीवादी लोकशाही, पायाभूत, मूलभूत गोष्टीच निर्माण झाल्या नसत्या. आंबेडकरांचा राष्ट्रउभारणीतील हा विचार समाजापुढे कधीच कोणी मांडत नाही, असे मोरे यांनी स्पष्ट केले. या वेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, आंबेडकर फक्त दलितांचे नेते होते, ते राज्यघटनेचे शिल्पकार होते. अशा विशिष्ट चौकटीत ठेवून आंबेडकरांना समाजासमोर जे आणले जाते, ते अन्यायकारक आहे. आंबेडकरांनी भविष्यवेधाचा विचार करून राष्ट्राच्या उभारणीकडे पाहिले. सामाजिक स्वतंत्रता मिळून दिली भारतीय समाजाला संवैधानिक, सामाजिक स्वातंत्र्यता मिळून देण्यात आंबेडकर यांनी मोलाची कामगिरी केली.राष्ट्रउभारणीचे मोठे कार्य आंबेडकर यांच्या हातून झाले, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले. फाळणीबाबतच्या मोरेंच्या विधानाशी डॉ. जाधव असहमत आंबेडकरांनी फाळणीचे समर्थन केले, या शेषराव मोरे यांच्या विधानाशी डॉ. जाधव यांनी असहमती दर्शविली. आंबेडकरांनी आपली भूमिका आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्पष्ट केली आहे, असे जाधव यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्याकडून विविध विषय पुढे येत आहेत. त्यामधील वित्तीय आयोग, मध्यवर्ती बँक स्थापनेमधील भूमिका, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम, चलन असे अनेक विषयांचे भविष्य आंबेडकरांनी यापूर्वीच वर्तविले होते, असे जाधव म्हणाले.