ठाणे महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शुक्रवारी शिवसेनेने कोपरी प्रभाग समितीचे सभापतिपद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देऊ केल्याने येथील राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने मनसेसमोर मैत्रीचा हात यानिमित्ताने पुढे केल्याचे बोलले जात आहे. प्रभाग समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचे सहा, भाजपचा एक, राष्ट्रवादी दोन आणि मनसेच्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली. माजीवाडा-मानपाडा, मुंब्रा आणि कोपरी या तिन्ही प्रभाग समित्यांची निवडणूक अटतटीची होण्याची शक्यता होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराने ऐन वेळेस माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. ठाण्यात शिवसेनेची सत्ता असली तरी सत्तेच्या राजकारणात सर्वाना सहभागी होता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती शिवसेनेचे महापालिकेतील नेते नरेश म्हस्के यांनी दिली. सत्ता असली की मनमानी कारभार न करता समन्वयाने विकासकामे व्हायला हवीत, असे शिवसेनेचे आधीपासूनच धोरण राहिले आहे. त्यामुळे मनसेला केलेल्या मदतीचे वेगळे अर्थ काढू नका, असेही ते म्हणाले. ठाणे महापालिकेच्या पाच विशेष समित्या तसेच दहा प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली. मुंबईचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कैलास जाधव यांनी पीठासीन अधिकारी म्हणून निवडणूकीचे कामकाज पाहिले. या निवडणुकीत महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी विजया लासे, क्रीडा व सांस्कृतिक सभापतिपदी काशीराम राऊत, शिक्षण समिती सभापतिपदी प्रभा बोरिटकर, आरोग्य समिती सभापतिपदी पूजा वाघ आणि गलिच्छ निर्मूलन समिती सभापतिपदी राजकुमार यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षपदी उज्वला फडतरे, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती अध्यक्षपदी प्राजक्ता खाडे, वागळे इस्टेट प्रभाग समिती अध्यक्षपदी अश्विनी जगताप, रायलादेवी प्रभाग समिती अध्यक्षपदी मनप्रीत शान, उथळसर प्रभाग समिती अध्यक्षपदी नंदा पाटील, कळवा प्रभाग समिती अध्यक्षपदी मनीषा साळवी आणि नौपाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी सुहासिनी लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीची माघार माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे बिंदू मढवी तर राष्ट्रवादीतर्फे उषा भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या प्रभागाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकाचे मत महत्त्वाचे ठरणार होते. मात्र ऐन वेळेस उषा भोईर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे बिंदू मढवी बिनविरोध निवडून आल्या. कोपरी प्रभाग समितीमध्ये मनसेतर्फे राजश्री नाईक तर काँग्रेसतर्फे मालती पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. या प्रभाग समितीमध्ये पुरेसे संख्याबळ असतानाही शिवसेनेने उमेदवार उभा केला नाही आणि मनसेच्या नाईक यांना जाहीर पाठिंबा दिला. नाईक यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के आणि नम्रता भोसले या दोघांच्या स्वाक्षऱ्या होत्या. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेला कोपरी प्रभाग समितीची जागा सोडून शिवसेनेने बेरजेचे राजकारण सुरू केल्याची चर्चाही या निमित्ताने रंगली आहे.