संथगती कारभारामुळे दाखले मिळण्यास विलंब; लांबलचक प्रक्रियेमुळे विद्यार्थी-पालकांना मनस्ताप

दहावी-बारावीचा परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरातील जिल्हा परिषदेसमोरील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी पालकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. गेल्या तीन आठवडय़ांपासून महाऑनलाइनच्या पोर्टलमध्ये बिघाड होत असल्याने येथील कारभार अतिशय संथगतीने सुरू आहे. येथील कर्मचाऱ्यांना विविध प्रमाणपत्रे तयार करण्यासाठी वेळ लागत आहे. सध्या सेतू सुविधा केंद्रामध्ये महा ई सेवा केंद्राच्या सर्व खिडक्यांवर विविध प्रमाणपत्रांसाठी केवळ फोटो काढून घेण्यात येतो. त्यानंतर ऑनलाइन सेवा सुरू झाल्यावर प्रमाणपत्रांचे काम करण्यात येते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रमाणपत्रे पाठविण्यात येतात. या प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली येतात. या संपूर्ण प्रक्रियेत वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे.

‘सेतू’ कार्यालयातून मिळणारे उत्पन्नाचे, रहिवासी, आदी दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना ठाण्याच्या तहसीलदार कचेरीजवळील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. महिनोन्महिने या विद्यार्थ्यांची कामे रखडली असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पणाला लागले असतानाही येथील कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यावर कर्मचारी येथे येणाऱ्यांशी उद्धटपणे बोलतच असल्याचे सांगत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी येथे चकरा मारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केली आहे. हे प्रमाणत्र काढण्याचे काम ऑनलाइन असूनही केवळ कर्मचाऱ्यांच्या संथ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. एवढा वेळ रांगेत उभे राहूनही आपले काम होईल की नाही याची त्यांना शाश्वती नसते, असे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेले दाखले लवकरात लवकर मिळावेत यासाठी सेतू आणि एक खिडकी योजना सुरू करण्यात आली. मात्र येथेही नागरिकांना तासन्तास ताटकळत ठेवले जाते. अर्ज भरून दिल्यानंतरही कर्मचारी नाहीत, यंत्रणेतील बिघाड अशी अनेक कारणे देत अर्ज घेण्यासाठी विलंब केला जातो. अर्ज दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या त्रुटींचे समाधान होईपर्यंत त्यांना हेलपाटे मारावे लागतात.

सेतू कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला वेळेत दाखले देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. मात्र बऱ्याचदा माहितीच्या आभावामुळे अशा प्रकारचे गोंधळ होत असतात. अर्जाच्या शेवटच्या पानावरील माहिती लोक नीट वाचत नाहीत. ती माहिती व्यवस्थित वाचली तर कागदपत्रांसंबधीच्या शंका दूर होण्यास मदत होऊ शकते. जर काही तक्रारी आल्यास आमच्याकडून त्यांचे निरसन केले जाईल.

पी. एस. भोईर, नायब तहसीलदार, सेतू केंद्र