मात्र सुधाकर चव्हाण यांचा दारूण पराभव बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार धरून दीड वर्षांपूर्वी अटक करण्यात आलेले सुधाकर चव्हाण यांचा अपवाद वगळता नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तीनही नगरसेवकांनी मोठे विजय संपादन केले. राबोडी आणि लोकमान्यनगर परिसरातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढणारे नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी प्रभागातील चारही जागांवर समर्थक उमेदवार निवडून आणल्याने या कलंकित नेत्यांचे प्रभागातील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वर्तकनगर, रेमंड परिसरातून विक्रांत चव्हाण यांनीही चांगल्या फरकाने विजय मिळवला. शिवाईनगर परिसरातून अपक्ष निवडणूक लढविणारे सुधाकर चव्हाण यांना तेथील मतदारांनी नाकारले असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा यांनी या भागातून दणदणीत विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, परमार यांच्या मुलास निवडणूक प्रचारात उतरवून सरनाईक यांनी जगदाळे, विक्रांत आणि चव्हाण यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. परमार यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या पत्रात या चार नगरसेवकांची नावे लिहून ठेवली होती. या पत्राच्या आधारे ठाणे पोलिसांनी या चौघांना अटक केली. ठाण्याच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. परमार यांनी लिहिलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांना परमार यांनी दिलेल्या निवडणूक देणग्यांचा उल्लेखही आढळला होता. या प्रकरणानंतर ठाणे महापालिकेतील भ्रष्ट साखळी मोडून काढण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा दबदबाही याच काळात येथील प्रशासकीय वर्तुळात निर्माण झाला. या प्रकरणात आरोप असलेल्या तिघा नगरसेवकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा रिंगणात उतरविले होते. राबोडी परिसरात नजीब मुल्ला यांचा दबदबा असून या ठिकाणी त्यांचा विजय अपेक्षित होता; मात्र लोकमान्यनगर भागातून निवडणूक लढविणारे हणमंत जगदाळे यांच्या पराभवासाठी आमदार सरनाईक यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. जगदाळे यांनी प्रभागातील मतदारांना भावनिक पत्र पाठवून मी दोषी असेन असे वाटत असेल तर मला मत देऊ नका, अशी साद घातली होती. असे असताना प्रचाराचा दिवस संपण्यापूर्वी शिवसेनेने या भागात परमार पुत्राला प्रचारात उतरविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. दरम्यान, निकालानंतर या चौघांपेकी जगदाळे आणि नजीब यांच्या पॅनलमधील चारही जागा विजयी झाल्या असून विक्रांत चव्हाण यांनीही विजय मिळवला आहे. चव्हाण निवडणूक लढवीत असलेल्या प्रभागातील अन्य तीन जागांवर मात्र शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. प्रभागातील मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल मी आभारी आहे. दोन वर्षांपूर्वी माझ्यासोबत घडले ते इतर कुणाहीसोबत घडू नये. - हणमंत जगदाळे