ठाण्यातील टपाल कार्यालयात जिल्ह्यतील पहिले एटीएम केंद्र पोस्टातील बचत खात्यांतून पैसे काढायला तासनतास रांगेत तिष्ठत राहावे लागणाऱ्या नागरिकांना आता झटपट पैसे मिळवणे शक्य होणार आहे. आधुनिकीकरणाची कास धरलेल्या टपाल कार्यालयाने खातेदारांना पैसे काढण्यासाठी एटीएम सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेतील ठाणे जिल्ह्य़ातील पहिल्या एटीएम केंद्राचे उद््घाटन मंगळवारी ठाण्यातील मुख्य कार्यालयात टपाल खात्याच्या मुंबई विभागाचे संचालक ई.व्ही.राव यांच्या हस्ते झाले. या एटीएम केंद्रातून ग्राहकांना पोस्टातील बचत खात्यातून पैसे काढणे शक्य होणार आहे. भारतात अजूनही जनतेच्या विश्वासाला पात्र असणारी सेवा म्हणून टपाल सेवेकडे पाहिले जाते. बँका असल्या तरी आजही पोस्टात बचत खाते असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, पोस्टातील बचत खात्यातून पैसे काढणे मोठे वेळखाऊ काम होते. या पाश्र्वभूमीवर टपाल विभागाने एटीएम सेंटरची उभारणी आणि कोअर बँकिंग सोल्युशन्स हे दोन प्रकल्प आखले आहेत. त्यानुसार देशात काही ठिकाणी पोस्ट कार्यालयांबाहेर एटीएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून ठाण्यातील पोस्ट कार्यालयाबाहेर एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमाला टपाल खात्याच्या ठाणे जिल्हा विभागाच्या वरिष्ठ अधीक्षक बिपाशा दास, मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्तर विलास इंगळे आदी टपाल कर्मचारीवर्ग समारंभास उपस्थित होता. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील पहिले एटीएम चेंबूरच्या मुख्य टपाल कार्यालयात उघडण्यात आले आहे. तर ठाण्यातील एटीएम केंद्र जिल्ह्यातील पहिले आहे. ‘सध्या ही सेवा पोस्टातील बचत खातेदारांसाठीच असून येत्या वर्षभरात इतर बँकांसोबत करार झाल्यानंतर ही सेवा सर्वासाठी खुली होईल,’ अशी माहिती ठाणे मुख्य टपाल कार्यालयाचे वरिष्ठ पोस्ट मास्तर विलास इंगळे यांनी दिली. येत्या वर्षभरात टपाल खात्याकडून संपूर्ण देशात एक हजार एटीएम सेंटर उभी राहणार आहेत. भविष्यात हे एटीएम अन्य बँकांशीही संलग्न करण्यात येणार आहेत. सुरुवातीचे सहा महिने या एटीएमद्वारे मर्यादित सेवा दिल्या जाणार असून त्यानंतर इतर बँकांप्रमाणे सर्व सेवा सुरू करण्यात येणार आहेत. लवकरच ठाणे विभागातील कल्याण, पालघरसह इतरही डाकघरे कोअर बँकिंग प्रणालीद्वारे जोडली जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.