दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि विविध पंचायत समितींच्या निवडणुकीची तयारी प्रशासकीय स्तरावर अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे वांगणी नगर पंचायतीची स्थापना लांबणीवर पडल्याचे कळते आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक विनाव्यत्यय पार पडल्यानंतरच वांगणी नगर पंचायतीबाबत निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. बदलापूरनंतर आता वांगणी झपाटय़ाने वाढू लागले आहे. नवनवी संकुले उभी राहू लागली आहेत. स्वस्त दरात स्थानकाशेजारी घरे मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत मध्यमवर्गीय चाकरमान्यांचा ओढा वांगणीकडे वळाला आहे. मात्र ग्रामपंचायत पुरेशा सुविधा देण्यात कमी पडत असल्याने वांगणीची नगर पंचायत करावी, असा ठराव मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आमसभेत मंजूर करण्यात आला होता. फेब्रुवारीत वांगणी नगर पंचायतीचा हा ठराव मंजूर झाल्यानंतर महिन्याभरातच आमदार कथोरे यांनी मुख्यमंत्र्यांना वांगणीसह कुडसावरे, डोणे, ढवळे या गावांची नगरपालिका स्थापन करण्याबाबतचे पत्र दिले. या पत्राचा संदर्भ देत अंबरनाथचे तहसीलदार प्रशांत जोशी यांनी या गावांच्या ग्रामसेवकांना दिलेल्या पत्राद्वारे या तिन्ही गावातील अकृषिक रोजगाराच्या टक्केवारीच्या प्रमाणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंबरनाथच्या तहसील कार्यालयाला प्राप्त झालेल्या पत्रात वांगणी नगरपालिका निकषबाह्य़ असल्याचे सांगण्यात आले असून नगर पंचायतीसाठी अनुकूलता दाखवण्यात आली आहे. नगर पंचायतीचे निकष स्पष्ट करून या निकषात बसत असल्यास नगर रचना विभागाच्या अभिप्रायासह प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही तहसीलदार अंबरनाथ यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे वांगणी नगर पंचायत स्थापनेसंदर्भात प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात होते. मात्र अंबरनाथ पंचायत समिती आणि ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमाची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. त्यासाठी मतदार याद्याही अंतिम झाल्या असून लवकरच याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तसेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निवडणुकींच्या तारखेबाबत स्पष्टताही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना नगर पंचायतीची घोषणा होणे अशक्य असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांकडून कळते आहे.