बदलापूरात नवीन रस्त्यांसाठी जुन्या वृक्षांचा बळी; पालिकेच्या कार्यपध्दतीवर पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

बदलापुरातील रस्तारुंदीकरण हे शहराचे आरोग्य टिकवणाऱ्या झाडांसाठी पुन्हा एकदा कर्दनकाळ बनल्याचे समोर आले आहे. रस्तारुंदीकरणासाठी शहरातील महत्त्वाच्या भागातील जुनी झाडे तोडल्याचे सहा महिन्यांपूर्वी समोर आले होते. तोच प्रकार पुन्हा झाला असून ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण’ कार्यालयाच्या आवारातील जवळपास डझनभर जुनी झाडे तोडली गेली आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत.

बदलापूर शहरात आता रस्तारुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम जोमाने सुरू आहे. त्यासाठी पालिकेने काही दिवसांपूर्वी शहरात अनधिकृत बांधकामविरोधी धडक कारवाईही केली होती. त्यामुळे रस्त्याचे काम वेगाने सुरू असल्याचे दिसत होते. मात्र या रस्त्याच्या कामासाठी पुन्हा शहराच्या जुन्या भागातील जुनी झाडे तोडल्याचे समोर आले आहे. शहराचे पाणी व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा’च्या पश्चिमेतील कार्यालयाच्या आवाराचा काही भाग रस्तारुंदीकरणात हवा होता. त्याप्रमाणे धडक कारवाईच्या दिवशी या कार्यालयाच्या सरंक्षक भिंती तोडण्यात आल्या. मात्र त्या भिंतीच्या आतील भागातील झाडांना मात्र सोडण्यात आले होते. मात्र नुकतेच या कार्यालयाच्या आवारतील जवळपास १२ झाडे कापण्यात आली आहेत. यात सर्वच झाडे जुनी होती, त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाल्याची भावना पर्यावरण प्रेमींमध्ये आहे.

शहरात सुरू असलेल्या रस्ते काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाच्या कामासाठी यापूर्वीही रेल्वे स्थानक, बस स्थानकाशेजारील आणि दत्त चौक रस्त्यावरील अनेक जुनी झाडे तोडली गेली होती. त्यामुळे अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती.  सध्या बदलापूर शहराची ओळख ही निसर्गसंपन्न शहर अशी आहे. त्यामुळे अनेक चाकरमान्यांसह उच्चवर्गीयांनीही बदलापूर शहराला पसंती दिली आहे. मात्र विकासाच्या नावाखाली जुन्या झाडांना तोडण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया अनेक सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.

तोडलेल्या झाडांचे पुनरेपण नाही

शहरातील अनेक विकास कामांसाठी यापूर्वीही झाडे तोडण्यात आली होती. मात्र त्या मोबदल्यात झाडे लावण्याचे काम मात्र शहरात झालेले नाही. यापूर्वी कात्रप मार्गावरही अशाच प्रकारे झाडे लावण्यात येणार होती. मात्र त्याचेही काम रखडल्याने अद्याप ती झाडे लावली गेली नाहीत. तसाच प्रकार इतर प्रकरणांतही झाला असून २०११ मध्ये शहरात वृक्षगणना करण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ४० हजार झाडे होती. मात्र त्याचे प्रमाण आता कमी झाल्याचे पर्यावरणप्रेमी सांगतात.

रुंदीकरणातही झाडे वाचवणे शक्य

विकासासाठी अनेक ठिकाणी झाडे तोडली जातात. मात्र आपल्या शहरात ती तोडलेल्या झाडांच्या बदल्यात पुन्हा नव्याने लावलेल्या झाडांचे प्रमाण कमी आहे. ते संतुलित असावे; जेणेकरून त्याचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही. त्याच वेळी राज्यातील पुण्यासारख्या शहरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेली झाडे वाचविण्यात आल्याची उदाहरणे आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यातही झाडे आहेत. त्यामुळे ते आपल्या बदलापूर शहरात का शक्य नाही. -ऋतुराज जोशी, नागरिक.