पालघर जिल्ह्य़ातील ‘प्रगती प्रतिष्ठान’ला लोकवर्गणीची गरज

पूर्वाश्रमीचा ठाणे आणि आता पालघर जिल्ह्य़ाचा भाग असणारे जव्हार व मोखाडा हे तालुके मुंबईपासून अवघ्या शंभर-सव्वाशे किलोमीटर अंतरावर असूनही पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य आदी प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. जव्हार तालुक्यातील एकूण २७२ पैकी निम्म्याहून अधिक तर मोखाडा तालुक्यातील शंभरहून अधिक पाडय़ांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात प्रचलित व्यवस्था अपयशी ठरली आहे. दुर्गम भागातील अनेक गावांपर्यंत अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. दुर्गमता आणि दारिद्रय़ या दुष्टचक्रात अडकलेल्या या समाजाला त्यातून बाहेर काढण्यासाठी जव्हार येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’ निरनिराळे उपक्रम राबवीत आहे.
शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सौर ऊर्जेद्वारे वीज आदी अनेक योजना प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात आल्या आहेत. कर्णबधिर मुलांसाठी शाळा, विद्यार्थी वसतिगृह, छोटे बंधारे, शेततळी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वीज नसणाऱ्या पाडय़ांना सौरपंपाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिजेंटा फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या शेती सुधार उपक्रमाचा या भागातील चार हजार शेतकरी लाभ घेत आहेत. मात्र तरीही गरजेच्या तुलनेत या सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. तेव्हा आता या भागातील सर्व आदिवासी पाडय़ांना नळपाणीपुरवठा करण्याची योजना प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. त्यामुळे गाव-पाडय़ांवरील महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबेल.
तसेच शुद्ध पाण्यामुळे आजारही आटोक्यात येतील, असा विश्वास प्रतिष्ठानच्या सचिव सुनंदा पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे. लोकसहभागातून या सर्व परिसराचाच उत्कर्ष साधण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना असून त्यासाठी सर्वानी ‘प्रगती प्रतिष्ठान’ला यथाशक्ती मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पालघर जिल्ह्य़ातील जव्हार आणि मोखाडा या आदिवासीबहुल तालुक्यात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ‘प्रगती प्रतिष्ठान’ला आता या विभागात अधिक सक्षमपणे पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी लोकवर्गणीचे दान हवे आहे.