क्रिकेट हा भारतात धर्म मानला जात असला तरी क्रिकेटवेडय़ांमध्ये महिलांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही प्रत्यक्ष मैदानात उतरून क्रिकेट खेळणाऱ्या किंवा या खेळाला आपलेसे करून त्यात कारकीर्द घडवणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, ठाण्यात राहणाऱ्या वर्षां नागरे या तरुणीने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतानाच या क्षेत्रात ‘स्कोअरर’ म्हणून स्वत:ची कारकीर्दही सुरू केली आहे. सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यात वर्षांने ‘स्कोअरर’ची भूमिका बजावली.ठाण्यातील लोकमान्य परिसरातील यशोधननगर येथे लहानाची मोठी झालेल्या वर्षांच्या घरात क्रिकेटची पाश्र्वभूमी नसताना तिला या खेळाने लळा लावला. या खेळात करिअर घडवण्यासाठी तिने माटुंगा येथे चालणाऱ्या अर्जुन पुरस्कारविजेत्या क्रिकेटपटू सुरेखा भंडारी यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, परंतु घरातून विरोध होऊ लागल्याने तिला क्रिकेटचे मैदान सोडावे लागले. मात्र क्रिकेटची साथ तिने सोडली नाही. या खेळात महिलांचा शिरकाव व्हावा, यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने चालवलेल्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून वर्षांला १९व्या वर्षी स्कोअरर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २००८मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्कोअरर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दोनच वर्षांत ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची परीक्षा देऊन राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. तेव्हापासून गेली पाच वर्षे ती स्कोअररचे काम करत आहे. अलीकडेच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुंबई विरुद्ध पंजाब सामन्यात ‘धावफलक हलता ठेवण्याचे काम’ वर्षांने केले.आव्हानात्मक कामदोन्ही फलंदाजांच्या धावा, त्यांची वैयक्तिक धावसंख्या, दोन्ही संघांच्या एकूण धावा, चौकार, षटकार, गोलंदाजांची षटके, गोलंदाजांचा वेग याची माहिती स्कोअररला नोंदवून ठेवावी लागते. यामध्ये चुकीला वाव तसा नसतोच. सहा तास चालणाऱ्या सामन्यामध्ये एका जागेवर बसून पंचांकडून येणाऱ्या सगळ्या नोंदी टिपण्याची महत्त्वाची जबाबदारी या स्कोअररवर असते.क्रीडा क्षेत्र खूप व्यापक असले तरी तुम्हाला संधी शोधण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात अनेक संकटे येण्याची शक्यता असते. आपले निर्णय चुकीचे तर नाहीत नाही, असासुद्धा प्रश्न पडतो. मात्र चांगले लोक भेटू लागल्यावर हा सगळा गुंता सुटत जातो आणि चांगले करिअर अनुभवता येते. स्थानिक स्तरावरती सामन्यांचे स्कोअरिंग करत असताना मैदानातील धूळ, उन्हाचा कडाका, पाण्याची व्यवस्था, तर कधी स्वच्छतागृहाची समस्यासुद्धा भेडसावत असे. मात्र या सगळ्या अडचणीच आपल्याला मोठं करतात.- वर्षां नागरेश्रीकांत सावंत, ठाणे