सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुन हिमालये केदारं सेतुबंधे तू रामेशं.. या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे भाविकांमध्ये वंदनीय असलेली बारा ज्योतिर्लिगे आपल्या देशात पार हिमालयापासून ते खाली दक्षिणेपर्यंत, पश्चिमेला सौराष्ट्राच्या सागर किनाऱ्यापासून ते श्रीशैल्य पर्वतापर्यंत ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. इच्छा असली तरी या सर्वाचे दर्शन घेणे शक्य नाही. तसेच बद्रीनाथ, द्वारका, पुरी व रामेश्वर या चार धाम यात्रेबद्दल म्हणता येईल. अनेकांच्या मनात या स्थानांचे दर्शन घ्यावे अशी तीव्र इच्छा असते. सर्वसामान्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी लालजीभाई मेस्त्रींनी पेल्हार परिसरात स्वत:च्या खासगी जागेत अतिशय भव्य असे मंदिर संकुल उभारले आहे. इथे थोडय़ाथोडक्या नव्हे तर चक्क एकशेएक देवतांचे दर्शन घडते. मंदिर संकुलाच्या दर्शनी भिंतीवरच तसा उल्लेख केलेला आहे. मंदिर संकुलाच्या सीमा भिंती ‘जय श्री राम, जय श्री कृष्ण’ अशा शब्दांकित आहेत. त्यामुळे संकुलात कुठेही फिरताना परिघाकडे नजर जाते आणि आपोआपच रामनामाचा आणि कृष्णनामाचा जप घडतो. प्रवेशद्वारापाशीच दोन पुराणकालीन ललनांचे पुतळे आपले स्वागत करतात. सोंडेने पुष्पमाला उंचावणारे भव्य गजराज आणि तलवार घेऊन पहारा करणारे पहारेकरी यांचे रंगीत पुतळे आपली अपेक्षा वाढवतात. कमानीवर ब्रह्मा-विष्णू-महेश यांची शिल्पे विराजमान आहेत. डावीकडे एक शिल्प आहे. गिरिशिखरावर ध्यानमुद्रेत बसलेले भोलेनाथ आणि पर्वतावर चक्राकार मार्गावरून शिवजींच्या दर्शनाला जाणारे तपस्वी आणि सर्वसामान्य नागरिक त्यात दाखवले आहेत. आत प्रवेश केल्यावर उजवीकडे श्री बजरंग बली व डावीकडे श्री गणेश यांच्या उभ्या अठरा फूट उंचीच्या मूर्ती आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळी मंदिरे आहेत. राधाकृष्ण, हातात लोण्याचा गोळा उंचावलेला रांगणारा बाळकृष्ण, रिद्धीसिद्धीसह गणपतीबाप्पाच्या मूर्ती संगमरवरात घडवलेल्या आहेत.

आतमधल्या एका दालनात पुरी येथील जगन्नाथ, बलराम सुभद्रा यांच्या तसेच तिरुपती येथील बालाजी, बद्रीकेदारनाथ व स्वामीनारायण यांच्या मूर्ती आहेत. याच तऱ्हेने अजून एका दालनात अष्ट विनायक व शिव पार्वतींच्या मूर्तीसह बारा ज्योतिर्लिगांचे दर्शन घडते. एका दालनात सर्व नवग्रह आहेत. शक्ती मंदिर संकुलात अठरा देवींच्या मूर्ती आहेत. याशिवाय राम दरबार, श्रीनाथ जी, विठ्ठल रखुमाई, सत्यनारायण, सूर्यनारायण, विराटस्वरूप दर्शन, श्री दत्तगुरू, कार्तीकेयस्वामी या देवतांबरोबरच श्री साई बाबा, श्यामजीभाई, श्री जलाराम बाप्पा यांसारख्या संतांच्यासुद्धा मूर्ती आहेत. सर्व मंदिरे प्रशस्त आहेत. त्यांची व्यवस्था चांगली ठेवलेली आहे.

मंदिरासभोवतीसुद्धा विस्तीर्ण परिसर आहे. राहायला निवासस्थाने, प्रसाधनगृहे, भोजनासाठी बसायची जागा, याचबरोबर मुलांना खेळायची साधने ठेवली आहेत. मागे गौशाळेची सुसज्ज इमारत आहे. त्याही मागे चिकूच्या बागा आहेत. चिकूची झाडे एवढी डेरेदार वाढली आहेत, की भर उन्हातसुद्धा हिरवा तंबू उभारल्याप्रमाणे झाडाखाली गर्द सावली पडते. खाली वाळलेल्या पानांची तपकिरी बिछायत. नारळी, साग व आंब्याची विपुल झाडे आहेत. सर्व वृक्षराजीला पाणीपुरवठा करायला बांधलेली विहीर आहे. हे सर्व संकुल एकाच वेळी मोठय़ा गटाने भाविक किंवा सहल आल्यास सोय व्हावी या दूरदृष्टीने बांधलेले असावे.या सर्व वास्तू, परिसर इथे पर्यटक येण्याची वाट बघताहेत असं वाटतं. एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा परिसर उभारताना हे सर्व संकुल नांदते होते. परंतु पुढच्या पिढीने रस न घेतल्याने किंवा काही अनाकलनीय कारणाने आता इथे फक्त दर्शन घ्यायला येणेच अपेक्षित आहे. एवढा सुसज्ज परिसर असा वाया जात असलेला पाहून अपार हळहळ वाटते. फार दूरवर प्रवास करू न शकणाऱ्या ज्येष्ठांना सुलभतेने देवदर्शन करायला हे ठिकाण उत्तम आहे.

  • कसे जाल? : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आठवर पेल्हार नाक्यावर विश्वकर्मा बाग आहे. महापालिकेच्या वसईवरून तसेच नालासोपाऱ्यावरून सुटणाऱ्या बसेस व एस टी महामंडळाच्या बसेसनी इथे येत येते. नालासोपारा इथून शेअर रिक्षाही मिळतात.