विठ्ठलवाडी आगारातून कणकवली भागात सुट्टीनिमित्त विशेष बसची सुविधा एस.टी महामंडळाच्या ठाणे विभागाने उपलब्ध करून दिली नसल्याने कणकवली, राजापूर, लांजा भागात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे. ही बस लवकर उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन ठाणे विभागाकडून प्रवाशांबरोबरच्या एका बैठकीत देण्यात आले होते. ते पाळण्यात न आल्याने चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वेळेत बस उपलब्ध न झाल्याने कणकवली, राजापूर, लांजा भागात जाणाऱ्या बदलापूर, कल्याण, अंबरनाथ परिसरातील रहिवाशांनी नाइलाजाने खासगी बससेवेला प्राधान्य दिले आहे. विठ्ठलवाडी आगारातून दरवर्षी एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ापासून कणकवलीसाठी विशेष जादा बसगाडय़ा सोडण्यात येतात. या बसचा सुट्टीनिमित्त गावी जाणारे कोकणवासीय लाभ घेतात. गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांना या बस परवडतात. गेल्या काही दिवसापासून चाकरमानी कणकवलीसाठी विशेष बस सुरू झाली का, अशी विचारणा विठ्ठलवाडी आगारातील कर्मचाऱ्यांकडे करत आहेत. तसेच विशेष आरक्षण सुविधा उपलब्ध झाली का याचीही चौकशी केली जात आहे. त्यास कोणताही प्रतिसाद मिळत नाही, अशी माहिती कोकण प्रवासी संघटनेचे मुरलीधर शिर्के यांनी दिली. रत्नागिरी, नाटे, गुहागर मार्गावर बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, कणकवली बससेवा सुरू होत नसल्याने चाकरमान्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उपलब्धतेप्रमाणे जादा बस सोडण्यात येतात. सुट्टीचा हंगाम असल्याने विविध भागात जादा बस सोडण्यात येतात. बसच्या कमतरतेमुळे ही अडचण निर्माण झाली आहे, असे महामंडळातील एका सूत्राने सांगितले.