भावली धरणातून पाणी ; टंचाईग्रस्त ९७ गावे, २५९ पाडय़ांना लाभ 

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे असूनही स्थानिकांच्या नशिबी तीव्र पाणीटंचाई असणाऱ्या शहापूरची तहान भागविण्यासाठी अखेर शेजारच्या नाशिक जिल्ह्य़ातील भावली धरणातील पाणी आरक्षित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शहापूरमधील टंचाईग्रस्त ९७ गावे आणि २५९ पाडय़ांचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.

इगतपुरी तालुक्यात भावली दारणा नदीच्या उगमस्थानी हे धरण असून दीड हजार दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आहे. धरण ५९० मीटर उंचीवर असून शहापूर तालुक्यातील गावे व पाडे २२० ते ५४० मीटर इतक्या उंचीवर असल्याने गुरुत्वाकर्षणाने या गावांना पाणी मिळू शकते. त्यासाठी एक युनिट इतक्याही विजेची आवश्यकता नाही, असे विवेक भीमनवार यांनी सांगितले. दर दिवशी प्रत्येक व्यक्तीला ७० लिटर पाणी पुरविण्याचा प्रयत्न या योजनेद्वारे केला जाणार आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील आदिवासी समाजाला सवलतीच्या दरात हे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. माळ, दांड यांसारख्या दुर्गम भागातील गावांबरोबरच वाशाळ, खर्डी, कसारा, चेरपोली, शहापूर, आसनगाव अशा २ लाख लोकवस्तीला त्याचा लाभ होईल. दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

गुरुत्वीय पद्धतीने पाणी वितरण

इगतपुरी तालुक्यात उंचावर असलेल्या भावली धरणातून गुरुत्वीय पद्धतीने शहापूर तालुक्यात पाणी वितरित केले जाणार असून आता लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. जलसंपदा विभागाने या संदर्भात बुधवारी पाणी आरक्षणाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून त्यानुसार भावली धरणातून दर वर्षी ४.५५ दशलक्ष घनमीटर पाणी ९७ गावांसाठी आरक्षित करून ठेवले जाणार आहे.