वसई-विरार महापालिकेचे गृहसंकुलांना आवाहन वर्षां जलसंचयन करणाऱ्या या संकुलांना वसई-विरार महापालिकेतर्फे २० टक्के अनुदान आणि घरपट्टीत सवलत देण्यात येते. मात्र या सवलतीचा फायदा खूपच कमी गृहसंकुले घेत आहेत. महापालिकेच्या या योजनेबाबत माहिती नसल्याने असे होत असल्याने अधिकाधिक संकुलांनी वर्षां जलसंचयन अनुदानाचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. वसई-विरार शहर महापालिका आणि जागरूक नागरिक संस्था संचालित ‘सुविचार प्रसार मंच’ यांच्या वतीने वर्षां जलसंचयन या विषयावरील कार्यशाळा नुकताच वसईत झाली. त्यावेळी या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली. पर्जन्य जलसंचयन या विषयावर गेली १५ वर्षे राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारे संदीप अध्यापक यावेळी कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी याप्रसंगी वर्षां जलसंचयनाची यंत्रणा कशी बसवायची याचे आराखडा आणि स्लाइड वापरून मार्गदर्शन केले. मुंबई, ठाणे आणि वसई येथील विविध प्रकल्प करतानाचे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव, त्याला आलेला खर्च आणि गुंतवणूक कशी वसूल होते याचीही आकडेवारी त्यांनी सादर केली. वसई विरार शहर महापालिकेचे परिवहन सभापती धनंजय गुप्ता यांनी पर्जन्य जल संचयन म्हणजे नक्की काय आणि त्याच्या विविध पद्धती स्लाइडद्वारे समजावून सांगितल्या. पर्जन्य जलसंचयन करण्यासाठी महापालिका नागरिकांना होणाऱ्या खर्चाच्या २० टक्के अनुदान देते तसेच घरपट्टीमध्ये सुद्धा सवलत देते. नागरिकांनी यासाठी आपल्या नजीकच्या पालिका कार्यालयात संपर्क साधावा. या उन्हाळ्यात अगदी पूर्णपणे नवीन यंत्रणा बसवून घेता आली नाही तरी किमान आपल्या छतावरचे पाणी पाईपने गोळा करून, फिल्टर करून आपल्या नजीकच्या विहिरीत अथवा बोअर वेलमध्ये सोडा, असेही आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी वर्षां जलसंचयनाबाबत विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन केले. स्थायी समितीचे सभापती नितीन राऊत यांच्यासह अनेक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते.