विकासाचा भव्य देखावा नागरिकांसमोर उभा करून निसर्गावर मोठे अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली आहे. हा धोका दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आपल्याच मस्तीत आणि विकासाचे भूत मानगुटीवर बसलेल्या व्यवस्थेकडून निसर्गाचे संवर्धन होण्याची शक्यता राहिली नाही. अशा कठीण परिस्थितीत नागरिकांनी निराश न होता, आपण राहतो त्या ठिकाणापासून पर्यावरण संवर्धनाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात करावी. अशा लहान कामांमधून विकासाचा मोठा प्रकल्प उभा राहणार आहे, असे प्रतिपादन ‘मॅगसेसे’ पुरस्कारविजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी रविवारी येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा नामोल्लेख टाळून सिंह यांनी त्यांच्या सरकारवर निशाणा साधला. रोटरी क्लब डोंबिवली पूर्वतर्फे दोन दिवसांचा ‘फुलपाखरू महोत्सव’ आयोजित केला होता. दुसऱ्या सत्राचे पुष्पगुच्छ गुंफताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी’चे कार्यक्रम संचालक डॉ. आयझ्ॉक किहिमकर, हरियालीचे पूनम सिंघवी, पर्यावरण दक्षता मंचचे प्रा. विद्याधर वालावलकर, न्यासचे विश्वास भावे, संयोजक डॉ. उल्हास कोल्हटर, डॉ. विजय आगे उपस्थित होते.छोटय़ातून मोठे कामनिसर्गातील साधन संपत्तीचा ऱ्हास सुरू झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नातील घट, असाध्य रोगांच्या साथी, सामाजिक जीवन पूर्ण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. नैसर्गिक ऱ्हासाचे हे दृश्यपरिणाम आहेत. मोठे काम करताना कोणाचे तरी नुकसान करावे लागते. तेच काम आताच्या सरकारने हाती घेतले आहे. लहान काम करताना कोणाचा कोणाला अडथळा नसतो. रोटरी क्लबने डोंबिवलीत फुलपाखरू उद्यान विकसित करून लहान कामातून स्थानिक पातळीवर मोठा प्रकल्प विकसित करू शकतो हे दाखवून दिले आहे. या उपक्रमाचा आदर्श घेण्याचे आवाहन सिंह यांनी केले. ते म्हणाले, नैसर्गिक साधनसंपत्तीवर शोषण, अतिक्रमण आणि प्रदूषणाने चढाई केली आहे. विकासाचा ज्वर चढलेल्या सरकारला या महत्त्वपूर्ण विषयांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. याउलट निसर्गाची लूट करणाऱ्यांचे सरकार दरबारात पायघडय़ा घालून सन्मान केले जात आहेत. २१ वे शतक शोषणाच्या प्रक्रियेत अडकले आहे.