ठाणे शहरातील पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील घोषित असलेल्या येऊर परिसरातील पाटर्य़ाच्या माध्यमातून होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी वर्तकनगर पोलिसांनी आता नागरिकांचीच मदत घेण्याचे ठरवले आहे. येऊर भागात २५ पोलीसमित्रांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्या माहितीच्या आधारे ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, येऊरमधील रस्त्यांवर वाहने उभी करून त्यातील साऊंड सिस्टम जोरजोराने वाजवून धांगडधिंगा घालणाऱ्यांवर तसेच पायवाटांमध्ये मद्यपान करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत. संजय गांघी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसर पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील घोषित करण्यात आला आहे, असे असले तरी येऊरमधील बंगल्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पाटर्य़ामध्ये डीजेचा वापर करून तेथील शांतता भंग केली जाते. या पाश्र्वभूमीवर वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी गेल्या महिनाभरापासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून बंगले मालकांना काही दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या आहेत. त्यामध्ये पाटर्य़ामध्ये डीजेचा वापर करू नये आणि दुसऱ्या व्यक्तीला पार्टीसाठी बंगला दिला असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी. तसेच या पाटर्य़ामध्ये डीजे वाजवून ध्वनिप्रदूषण केल्यास आयोजक व बंगल्याचे मालकांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या परिसरात २५ पोलीसमित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची माहिती तात्काळ मिळू शकेल म्हणून त्यांची या मोहिमेत मदत घेण्यात येत आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी दिली. वाहनांत साऊंड सिस्टम वाजवून धांगडधिंगा घालणाऱ्यांवर तसेच पायवाटांमध्ये मद्यपान करणाऱ्यांवरही कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.