हिमालय-आल्प्स-रॉकी पर्वतरांगांमध्येही नाही, असं विलक्षण काही आमच्या ‘जावळी’च्या ट्रेकमध्ये गवसलेलं. जुन्या रानवाटा तुडवताना स्पर्श झाला होता रसरशीत इतिहासाचा, शूरांच्या कथा उरी जपणाऱ्या काळजांचा आणि     शिव-प्रतापाच्या पाऊलखुणांचा!

रविवार दुपारची निवांत वेळ. घरातलं  ‘शिवचरित्र’ हाती घेतलं. त्या दिवशी थबकलो होतो ‘जावळी प्रकरणा’पाशी.

Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

..कसे ते जावळीचे अजस्र पहाड-दुर्ग आणि किर्र्र अरण्य! कसे ते चंद्रराव मोरे आणि त्यांचा रुबाब! कशी ती थरकाप उडवणारी निसणीची वाट आणि जंगलातला रडतोंडी घाट!  कशी आपलीशी केली महाराजांनी ही जावळी आणि त्यातली बावनकशी सोनं असलेली माणसं! कशी ती अरण्यात वसलेली महाबळेश्वर – वरदायिनी- कालभरव – भवानीची पुरातन राऊळं! किती ती दूरदृष्टी भोरप्याच्या डोंगरावर बेलाग प्रतापगड बांधून घेण्याची! किती भयंकर ते स्वराज्यावर रोंरावत आलेलं वादळ – क्रूर-कपटी अफझलखानाचं! अन, किती थरारक कूटनीती राजांची, खानाला जावळीत खेचून आणून नेस्तनाबूत करणारी!

कित्येक तास अक्षरश: हरवून गेलो होतो जावळीच्या थरारात. हा इतिहास दरबार-महालांमध्ये नाही, तर सह्यद्रीच्या दुर्ग-डोंगरांमध्ये आणि नद्यांच्या खोऱ्यांमध्ये घडलाय. त्यामुळे, एव्हाना ट्रेकर मावळ्यांच्या हंटरशूजचे घोडे िखकाळू लागलेले. शिध्याची शिदोरी सोबत घेतली. हॅवरसॅकचं खोगीर चढवलं. हायकिंग हॅटचं मुंडासं चढवलं आणि कूच केलं ‘जावळी’कडे -रोमांचक इतिहासाच्या पाऊलखुणांचं दर्शन घेण्यासाठी!

मध्यरात्री अडनिडय़ा वेळी निघून, पुणे -सातारा रस्त्यावर टोल भरून वर खड्डय़ांचा मार सहन करत प्रवास केलेला. वाई फाटय़ावर गाडी वळली, तसं हायवेवर कुरकुरणारे अजस्र ट्रक्स आणि हॉर्न्‍स मागे पडले. पसरणी घाटातून लपेटदार वळणं घेताना, कारच्या टेपवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्द घुमू लागले- ‘जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी, जी बुद्धि पांच शाह्यंस शत्रुच्या झुलवी, जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी, जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी..’ शिवचरित्रातली ही यशोगाथा खोलवर जपून ठेवणाऱ्या अरण्य – दुर्ग – राऊळ – नद्या -रानवाटांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चौघेजण जावळीच्या ट्रेकला निघालेलो..

उतराई रडतोंडी घाटाची…

ट्रेकच्या पहिल्या दिवशी महाबळेश्वरच्या पश्चिमेला कोयनेच्या खोऱ्यात डोंगरझाडीतल्या जावळीला उतरायचं होतं. ट्रेकच्या पूर्वार्धात महाबळेश्वरपासून ऐतिहासिक रडतोंडी घाटाने उतरून पुढे प्रतापगड चढाई आणि पुढे मुक्कामाला जावळी गावातल्या चंद्रराव मोरेंच्या कुलदैवताच्या राऊळापाशी पोहोचायचं होतं. हे सगळं अर्थातच कारने नव्हे, तर वाटांवरून पायगाडीने करायचं होतं. दुतर्फा गर्द झुकलेल्या झाडोऱ्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून मुंबई टोकाकडे चालत निघालो. पश्चिमेकडून तरंगत येणारे ढग हलकेच स्पर्श करून सुखावत होते, गारठवत होते. पोलादपूर नाक्यावरच्या शेकोटीच्या उबेचा मोह टाळला, अन् ढगात हरवलेल्या रस्त्यावरून झपाझप निघालो. खॅखॅ असा आवाज आसमंताला चिरत गेला, म्हणून थबकलो. डोक्यावरच्या जांभळाच्या झुकलेल्या फांद्यांवर काटक्यांनी बांधलेल्या मोठय़ा घरटय़ापाशी हालचाल जाणवली. खोडाच्या एका बाजूने लालचुटूक गोंडस तोंड डोकावलं. हा होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ (इंडियन जायंट स्क्विरल). गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असा हा शेकरू हे सह्यद्रीच्या जैववैविध्याचं प्रतीकच!

एरवी मुंबई टोकापासून कोयनेच्या कुशीतल्या जावळी – प्रतापगडचं सुरेख दृश्य दिसतं. आत्ता मात्र सगळंच ढगात गुरफटलेलं. रडतोंडी घाट गाठण्यासाठी मुंबई टोकाच्या शेजारून पश्चिमेला उतरणारी मोठ्ठी रुंद पाऊलवाट गवसली. उंचच उंच झाडांमधून, मळलेल्या झक्क वाटेवरून, ढगांमुळे ओलसर झालेल्या खडकांवरून निसटत आणि उभा उतार उतरत दीडशे मीटर उतराई केली. पोलादपूरकडे जाणाऱ्या आंबेनळी घाटाचा डांबरी रस्ता पार केला आणि हिरडा-गेळ-जांभळाच्या झाडोऱ्यामधून वळणं घेत पायवाटेने मेटतळे गावापाशी पोहोचलो. हायवेने ५०० मीटर चालल्यावर मोठ्ठया वळणावर घाटाच्या संरक्षक िभतीमधून बाहेर पडलं, की रडतोंडी घाटवाटेची सुरुवात झाली..

रस्त्यावरच्या हॉर्न्‍सचा आवाज मागे पडला. भर्राट वारा आला. ढगांची चादर दूर होऊ लागली. आसमंत उलगडू लागला. महाबळेश्वरपासून प्रतापगड मकरंदगडापर्यंत पसरलेल्या उभ्या-आडव्या पहाडांचं, गर्द दाट झाडीचं, कोयनेचं, ‘जावळी’च्या खोऱ्याचं प्रथमच दर्शन होत होतं. आणि कानांत घुमू लागला घोडय़ांच्या टापांचा आवाज.. भास का? भासच तो. पण हे नक्की की जावळी आम्हाला वेढून घेऊ लागलेली, आम्हीही ‘गोवले’ जाऊ लागलेलो. कारण ‘येता जावळी, जाता गोवळी’, असंच म्हटलं होतं जावळीच्या चंद्रराव मोरेंनी शिवरायांना. स्वराज्यवृद्धीसाठी महाबळेश्वर रायरी परिसरातलं घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचं खोरं अतिशय मोक्याचं. त्यामुळे, महाराजांना मोऱ्यांसोबत एकतर मत्री किंवा संघर्ष अटळ होता. दुर्गम जावळीवर सत्ता करणाऱ्या चंद्रराव मोरेंचं घराणं वीरांचं, शिवभक्तांचं आणि जावळीचा सार्थ अभिमान असणारं. त्यामुळे चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी!’’ अखेरीस इ. स. १६५६ ला महाराज स्वत जातीने जावळीवर चालून आले. महाबळेश्वरवरून जावळीत उतरण्यासाठी मोठी तुकडी दक्षिणेच्या ‘रडतोंडी घाटा’ने उतरली आणि तिथे मोऱ्यांच्या सन्याने प्रतिकार केला. त्याच वेळी खुद्द राजे छोटी तुकडी घेऊन उत्तरेच्या ‘निसणीच्या घाटा’ने महाबळेश्वरवरून जावळीत उतरले आणि जावळी जिंकून घेतली. जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे – अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड, मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, ढवळेघाट, पारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत), ताकदीचे डोंगर (भोरप्या. ज्यावर प्रतापगड बांधला), थेट सिंधुसागरापर्यंत झेप घेता येणं अन् मुख्य म्हणजे जावळीतले तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे, तानाजी-सूर्याजी मालुसरे) गवसणं अशा खूप गोष्टी साधल्या होत्या. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर आसमंतात घोडय़ांच्या टापा, नगारे, तुताऱ्या आणि तोफांचा आवाज निनादत राहिला.

27-lp-nature

..जावळीच्या इतिहासाचा हा थरार काळजात जपणाऱ्या ‘रडतोंडी’ आणि ‘निसणी’ या घाटवाटांचं दर्शन आम्ही घेत होतो. गच्च कारवीच्या टप्प्याखाली रानात उतरणारी मंद उताराची डोंगरसोंड आणि त्यावरून उतरणारी रडतोंडी घाटाची वळणावळणांची प्रशस्त वाट आता दिसू लागली. वाईकडून प्रतापगडाकडे जाताना अफझलखान याच वाटेने गेलेला. खानाला चक्रव्यूहात खेचण्यासाठी राजांनी आसपासच्या डोंगरवाटा बंद करून, रडतोंडी घाट मात्र खास बांधून घेतलेला असणार, अशा खुणाच सामोऱ्या होत्या. व्यवस्थित बांधून काढलेली फरसबंदीची निवांत लांबचलांब वळणं घेत जाणारी वाट होती. आधी फारशी झाडी नसलेल्या डोंगरसोंडेवरून वाट शंभर मीटर उतरली, पण मग मात्र टेपावरून उतरताना दाट झाडीचे टप्पे सुरू झाले. गर्द झाडोऱ्यातून सळसळ करत जाणारी बारीक रानवाट सुरू झाली. अंधाऱ्या रानाला चिरत जाणारी वाट क्वचित मोकळवनात आली, की समोर मकरंदगड आणि प्रतापगड खुणावायचे. कधी कधी उंचच उंच वृक्षांचा, गच्च पाचोळ्याचा आणि अजस्र वेलींचा गुंता इतका दाटत गेला, की वाट सपशेल हरवायची. ‘रडतोंडी’ हे आपलं नाव सार्थक करणाऱ्या घाटवाटेचा चपखल उपयोग करून, महाराजांनी खानावर मानसिक दृष्टय़ादेखील कशी कुरघोडी केली असेल, हे चांगलंच जाणवलं. झाडांना बांधलेल्या भगव्या फिती आणि वाटेच्या कडेला बसवलेले दगड शोधत उतरत गेलो. आंब्याच्या खोडांवर वाऱ्यावर झुलणाऱ्या ऑíकडच्या झुबक्यांना दाद दिली. मंद उताराची लांबच लांब आडवी वाट शेवटी गोगलेवाडीपाशी डांबरी रस्त्यावर पोहोचली. महाबळेश्वर बाजारपेठेपासून निघून रडतोंडी घाटाची ६५० मीटर उतराई करायला तीन तास लागलेले.

इतिहासाच्या पाऊलखुणा

गोगलेवाडीपासून डांबरी रस्त्यावरून प्रतापगडाच्या पायथ्याच्या ‘पार’ गावाकडे निघालो. वाटेत कोयना नदीवरचा कमानींचा दगडी पूल लागला. हा पूल शिवकालीन, म्हणजे कदाचित अफझलभेटीसाठी बांधलेला. ऋतुचक्राचा आणि कोयनेच्या तुफान प्रवाहाचा तडाखा सोसूनही, पूल भक्कम आणि आजही वापरात आहे. पुलाजवळच्या गणेशाचं दर्शन घेतलं. आंब्या-फणसाच्या दाट सावलीतून चालत ‘पार’ गावात पोहोचलो. गाव प्रतापगडाच्या कुशीत. मुळचं नाव ‘पार्वतीपूर’. कोकणात उतरणाऱ्या पारघाटाच्या माथ्यावरचं हे गाव. गावात काळ्या पाषाणातल्या ‘आदिशक्ती श्रीराम वरदायिनी’चं देखणं राउळ. टुमदार ‘पार’ गाव आम्हांला फार आवडून गेलं.

शिव-प्रतापाचा प्रतापगड…

पार गावातला राजांचा पुतळा पाहिला. आता मात्र वेध लागलेले प्रतापगडाचे! गावातून उंच डोंगरझाडीमुळे गड एकदम लपून गेलेला. पाण्याच्या पाइप्सच्या साथीने जाणाऱ्या वाटेवरून गडाची चढाई सुरू केली. वाट सुरेख मळलेली. दाट झाडोऱ्यातून चढताना आणि आसमंतात दूरवर नजर टाकताना, गडाचं भौगोलिक महत्त्व चांगलंच लक्षात येत होतं. मूळ सह्य़ाद्रीधारेपासून थोडक्या अंतरावर सुटावलेल्या ‘भोरप्या’ (तथा ‘रानआडवा गौड’)डोंगरावर, जावळीच्या जंगलात, कोयनेच्या काठावर आणि पार घाटाच्या माथ्यावरचं हे अत्यंत मोक्याचं स्थान. राजांना कल्पना होतीच, की जावळी जिंकणं म्हणजे थेट आदिलशहाला डिवचणं आणि त्याचा दुष्परिणाम आपण ओढवून घेणार आहोत. त्यामुळे दूरदृष्टीने त्यांनी मोरोपंत िपगळ्यांकरवी जावळीत बेलागदुर्ग बांधून घेतला. गड पाहून राजे खूश झाले आणि त्यांनी नाव ठेवलं – ‘दुर्गप्रतापगड’!

28-lp-nature

.. पार गावातून निघाल्यावर दाट झाडीतून अन् उंच कारवीमधून चढाई होती. वळणावरच्या गेळाच्या झाडावर मुंग्यांनी चिखलाचे घरटे बांधलेले, तर पायथ्याशी गडमुंगीच्या वारुळाची चिरेबंदी. उभ्या दांडावरच्या चढाईनंतर आता थोडी निवांत आडवी वाट होती. पाचोळा चुबुक-चुबुक तुडवत निघालो. महाराजांना भेटायला आतुर झालेला अफझलखान ज्या वाटेने पार गावातून प्रतापगडाकडे गेला, त्याच वाटेने आम्ही निघालेलो. अशक्य-अतक्र्य वाटावा अशा इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या मातीचं-मुलखाचं दर्शन आम्ही घेत होतो.

महाराजांनी जावळी जिंकली होती, ती बळापेक्षा युक्तीने! त्यामुळे, आदिलशहाचा तिळपापड झाला होता. शिवाजीराजांना विजापूर दरबारात जिवंत किंवा मृत हजर करण्याचा विडा अफझलखानाने उचलला. अफाट घोडदळ, पायदळ, बंदूकधारी, हत्ती, उंट, तोफा घेऊन खान चालून येऊ लागला. पूर्वी पुरंदरजवळ खळद-बेलसरच्या पठारावर फत्तेखानशी लढतानाच राजांनी जोखलेलं, की राजधानीचा राजगड बेलाग, पण पठारी भागाकडून वेढा देण्यास सोप्पा. म्हणून, अफझलखानासोबतच्या संघर्षांसाठी ठिकाण राजांनी ठरवलं – जावळी! खानाने पायथ्याच्या वाईमध्ये छावणी टाकली आणि राजांना खलिता धाडला, ‘शत्रूस प्रवेश करण्यास दुर्गम असलेला हा चंद्ररावाचा जावळी प्रदेश तू मला परत कर’. खानाने वाईस बोलावल्यावर राजांनी आपण फार घाबरलो असल्याचे भासवून समझोत्यास तयार आहोत असं कळवलं, ‘तुम्ही तर पृथ्वीतलावरचा एक दागिना आहात. तुमच्याबरोबर युद्ध म्हणजे आगीशी खेळ. तुम्ही खरंच येथे या आणि मन भरून जावळीचे दर्शन घ्या. तुम्ही लवकरात लवकर इकडे आलात तर बरे होईल, म्हणजे माझी सर्व भीती निघून जाईल. जावळीच्या या घनदाट, खोल आणि दूरवर पसरलेल्या जंगलात तुमच्या सन्याला जगातल्या सर्वोच्च सुविधा मिळतील.’ आणि १० नोव्हेंबर १६५९ ला प्रतापगडच्या पायथ्याशी खानाची आणि राजांची भेट ठरली. प्रतापगडाच्या कुशीतल्या जननीच्या टेंब्यावर शाही शामियाना उभारला गेला होता. भेटीची घटका जवळ आलेली. त्या रोमांचक इतिहासाच्या विचारांनी आणि डोंगरचढाईने आता धाप लागलेली!

पार गावातून निघून पाऊण तास झालेला. गड एखादवेळा झाडोऱ्यातून किंचित डोकावलेला, पण किती लांब याचा अंदाज येईना. वाऱ्याचा पत्ता नाही. घशाला कोरड पडलेली. पाठीवरचं ओझं जड झालेले. एकसमान लयीमध्ये चढाई चालू ठेवली. झाडीतून चढणाऱ्या उभ्या वाटेने मोठ्ठं वळण घेतलं आणि आम्ही अक्षरश थबकलोच. डावीकडे निळ्या आभाळाच्या पाश्र्वभूमीवर तुरळक विखुरलेल्या ढगाच्या पुंजक्यांमधून उंचावलेला प्रतापगडाचा माथा आणि उजवीकडे पोलिस बंदोबस्तीत असलेली खानाच्या कबरीची वादग्रस्त वास्तू. हीच.. हीच ती जागा, जिथे जावळीच्या इतिहासातला थरार घडला. शामियान्यात खानाच्या कपटाची चाहूल लागताच, ज्याप्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट फाडलं, तसं राजांनी वाघनखांनी खानाची आतडी बाहेर काढली. कवी भूषण यांनी लिहिलं, ‘एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह सिवा है’. ज्या युद्धशैलीला समर्थ रामदासांनी वृक्युद्ध (लांडगेतोड) म्हटलंय, त्या गनिमी काव्याने राजांनी शत्रूला आपल्या मोक्याच्या जागी खेचून आणलं आणि नामशेष केलं. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीसह सप्तमी, शके १५८१, गुरुवार १० नोव्हेंबर १६५९! आजही, मार्गशीर्ष षष्ठीला जावळी-प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा होतो. इतिहासातल्या अनोख्या युद्धांचा अभ्यास करताना आजही आमची भारतीय सेना जावळी-प्रतापगडाच्या युद्धाचा अभ्यास करते..

शक्तिपीठ प्रतापगडाचं दर्शन…

गडावर डांबरी रस्त्याने येणाऱ्या गाडय़ांचे हॉर्न्‍स सुरू झाले आणि आधुनिक जगात परतलो. चिलखती बांधणीच्या टेहळणी बुरुजावरच्या भगव्या झेंडय़ाला मुजरा करून गडावर दाखल झालो. महाबळेश्वरपासून निघाल्यापासून पाच तासांत (रडतोंडी घाटाची ६५० मी. उतराई, पार गावातून ४०० मी. चढाई आणि १३ किमी चाल झाल्यावर) गडावर पोहोचलेलो. राजांनी बांधून घेतलेलं – पण आता गर्दीत आणि नव्या वास्तूंमधून हरवलेलं- दुर्गस्थापत्य शोधायचा प्रयत्न केला. महिषासुरमर्दनिी रूपातील भवानीमातेसमोर नतमस्तक झालो. गडावर कितीही गर्दी असली तरी भवानीमाता, केदारेश्वर आणि राजांचं भव्य अश्वारूढ शिवशिल्प नि:संशय शक्तिपीठे आहेत, याची अनुभूती घेतली. राजांच्या वीररसयुक्त पुतळ्याच्या चौथऱ्यावर कोरलेले शब्द ‘माझ्या मायभूमीचे रक्षण, हे माझे परम कर्तव्य’ उरात साठवले. गडावरून चौफेर दर्शन घडलं जावळीच्या अथांग सह्य़ाद्री मंडळाचं!

वाडा कुंभरोशीकडे उतराई…

चढाई आग्नेयेच्या पार गावातून केलेली, तर आता उतराईसाठी ईशान्येच्या वाडा कुंभरोशी गावाकडची पाऊलवाट तुडवू लागलो. गडाचा डांबरी रस्ता बनायच्या आधी हीच मुख्य वापरातली वाट होती, त्यामुळे ठिकठिकाणी बांधून काढलेली. समोर महाबळेश्वरचं झाडीभरलं पठार नजरेसमोरचं सारं क्षितिज व्यापून टाकत होतं. घनदाट झाडीतली मस्त मळलेली वाट आणि सुरेख प्रसन्न चाल होती. उभा उतार उतरणारी वाट उतरून तासाभरात वाडा कुंभरोशीला पोहोचलो. पोलादपूर हायवेवरचं छोटंसं गाव. ‘अद्रकवाली चाय’चं इंधन मिळालं. आमचं गंतव्य होतं जावळी खोऱ्यातलं एक ऐतिहासिक ठिकाण – चंद्रराव मोरेंच्या वास्तव्याचं मुख्य स्थान – ‘जावळी’ गाव!

मोरेंच्या कुलदैवताच्या चरणी…

महाबळेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून लांबच लांब रटाळ चाल चालत राहिलो. चालून चालून पायाला ब्लिस्टर्स आलेले. अखेरीस डावीकडे ‘जावळी’ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा फाटा आला. मावळतीचे सूर्यकिरण आता महाबळेश्वरच्या एलफिस्टन टोक ते लॉडविक टोक ते मुंबई टोक अशा जबरदस्त कातळभिंतींना उजळवू लागलेले. कोयनेच्या चिंचोळ्या पात्राच्या काठाने वळणं घेत जाणारा रस्ता जावळी गावातल्या काळभरव मंदिरापाशी थबकला. प्रतापगडापासून निघून सहा किमी चाल झाली होती, तर दिवसाभरात १९ किमी. पाराखाली विसावलो. काळभरवनाथ आणि कुंभळजाआई हे जावळीच्या मोरेंचं कुलदैवत! देवळात हरणाची िशगे लटकवलेली. चंद्रराव मोरे आणि शिवरायांनी पुजलेली ही दैवते. या देवतांसमोर नतमस्तक होताना कुठेतरी जावळीच्या इतिहासाची जवळून भेट झाल्यासारखं वाटलं. देवळामागच्या टेकाडावर मोऱ्यांच्या वाडय़ाचे अवशेष – जोत्याची जागा दाखवतात.

काळभरवनाथ मंदिराबाहेर आलो. परिसरातल्या जुन्याजाणत्या वृक्षांवर बागडणाऱ्या मोराने आणि भल्यामोठ्ठय़ा िशगचोच्या धनेशाच्या (हॉर्नबिल पक्षी) जोडीने आमची दखल घेतलेली. अंधार दाटू लागला. मुक्कामाची तयारी सुरू केली. (मंदिरात मुक्कामास परवानगी नाही). पूर्वेला पौर्णिमेच्या निखळ चांदण्यात महाबळेश्वरच्या पहाडाची उंच कड उजळून निघालेली, तर पश्चिमेच्या धारेवर गूढ रानवा दाटलेला. गरम सूपचा आस्वाद घेत गप्पाष्टक जमलं. गावकऱ्यांनी देवळाजवळ येणाऱ्या गव्यांची-रानडुकरांची भीती घातलेली. त्यामुळे एकीकडे सावध नजर; तर दुसरीकडे एका दिवसात गप्पांसाठी होता जावळीचा इतिहास, जावळीचा भूगोल आणि अधूनमधून अंगावर येणारा आधुनिकतेचा कोलाहल! गारवा दाटत गेला. रुचकर जेवण झालं. जावळीच्या कुशीत असल्याच्या भावनेनेच मनात आनंद दाटलेला!

जावळीतली प्रसन्न सकाळ

.. जावळीच्या कुशीतल्या झक्क मुक्कामामुळे मंडळी ताजीतवानी झालेली. ट्रेकच्या उत्तरार्धात जावळीमधल्या इतिहासाची साक्षीदार असलेली ‘निसणी’ची अवघड वाट चढून महाबळेश्वरला जायचं होतं. तांबडफुटीआधीच दमदार न्याहारी करून कूच केलं. डांबरी रस्त्याने चालत कोयनेच्या गूढरम्य खोऱ्यात शिरू लागलो. ‘खालच्या जावळी’च्या वाडीतून ‘मधल्या जावळी’च्या वाडीत आणि पुढे ‘वरच्या जावळी’च्या वाडीत पोहोचलो. उजवीकडचं लॉडविक टोक, समोरचं एल्फिन्स्टन टोक आणि महाबळेश्वरचा झाडीभरला माथा ढगात हरवलेला. आता डांबरी रस्ता किंचित उजवीकडे पूर्वेला वळू लागलेला – लॉडविक आणि एलफिस्टन टोकांदरम्यान पसरलेल्या कोयनेच्या दरीच्या कुशीत शिरू लागलेला. किनाऱ्याकडे येणाऱ्या, विखुरत जाणाऱ्या, फुटत जाणाऱ्या लाटा असाव्यात, अशा असंख्य डोंगरवळ्यांच्या सह्य़ाद्री-सागराकडे आम्ही निघालेलो. बाजूचं वळणवेडय़ा कोयनेचं पात्र, आंबा-फणस-बांबूचा गच्च रानवा, वीरघराण्यातल्या मोरे वंशजांची घरं, डोंगरउतारांवर विखुरलेल्या शेताडीची नक्षी, फडफड असा विलक्षण मोठ्ठा आवाज करत दरीच्या पोटात खोलवर पल्ला मारत जाणारे हॉर्नबिल्स, गच्च झाडीवेलींनी नटलेले डोंगरउतार, उभ्या घसरडय़ा डोंगरसोंडा, माथ्याखालची सलग कातळिभत आणि गच्च रानाचे टप्पे आणि त्यासोबत रेंगाळलेले तुरळक ढग अशा चित्ताकर्षक पॅनोरमानं आम्हाला भारावून टाकलेलं.

निसणीच्या वाटेचा थरार

चिंचोळ्या होत गेलेल्या जावळी खोऱ्यातलं दरीच्या पोटातलं शेवटचं गाव – ‘दरे’! इथून महाबळेश्वरमाथा ५०० मी. उठवलेला. महाबळेश्वरला चढण्यासाठी – एल्फिन्स्टन टोकाजवळ चढणारी ‘निसणीची वाट’ आणि दुसरी – बाजारपेठेची वाट. निसणीच्या वाटेचं आकर्षण होतं, कारण याच वाटेने जावळीत उतरवून महाराजांनी जावळी जिंकलेली.

दरे गावातल्या फणसाच्या झाडाखाली विसावलो. वाटेचा अंदाज घेऊ लागलो. डावीकडे (उत्तरेला) उतरत आलेल्या उभ्या डोंगरसोंडेवरून वाट असणार होती. कोयनेचं पात्र पार करून शेताडी पार केली. आंब्याच्या डेरेदार झाडापासून पाठीमागे दरे गाव आणि पाठीमागची लॉडविक टोकाची सोंड विलक्षण देखणी दिसत होती. दाट झुडपांमधून तीव्र चढाची वाट चढाई सुरू झाली. १०० मी. चढाई झाल्यावर पहिल्या टेपावरून किंचित डावीकडे जात, आता मुख्य सोंडेवरची चढाई सुरू झाली. अरुंद धारेवरून वाऱ्याच्या झुळका अंगावर झेलत, कधी सोनसळी गवतातून आडवी वाट होती, तर कधी फसव्या घसाऱ्यावरून चढाई होती. दम खात मागं वळून पाहिलं, तर ढगांच्या दुलईतून जावळीला हलकेच जाग येत होती. ढगांमधून एखादा सूर्यकिरण डोंगरझाडी उजळवत होता आणि खोऱ्यात ढगांच्या सावल्यांची नक्षी विखुरलेली. पल्याड प्रतापगड ढगांशी लपाछपी खेळत होता. अप्रतिम दाट डोंगरझाडीचं प्रसन्न दृश्य!

निसणीच्या सोंडेच्या माथ्याच्या खाली असलेल्या कातळिभती आता खुणावू लागलेल्या. वाटेवरच्या दुसऱ्या टेपावरून आडवं चालत गेलं, की निसणीचा थरार सुरू होणार होता. चढावर मोक्याच्या ठिकाणी बहरलेल्या झाडापर्यंत पोहोचणं आणि त्यापुढे कातळातून चढाईमार्ग असणार, असा अंदाज बांधला. मान खाली घालून एका सलग ऱ्हिदममध्ये हळूहळू, पण न थांबता चढाई करत राहिलो. रखरखीत उभ्या चढावरचा घसारा चढून झाडापर्यंत पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेताना, जावळीचं विहंगम दृश्य सामोरं होतं. वाऱ्याने हलणाऱ्या रानापल्याड कोयनेची गूढ दरी, बाजारपेठेची वाट, लॉडविक टोक, प्रतापगड आणि एल्फिन्स्टन टोकाचे कडे असं सुरेख दृश्य!

निसणीचा मुरमाड घसारा आणि कातळावरची थरारक चढाई आमची वाट पाहत होती. उभ्या घसाऱ्यावरून चढत, उजवीकडे आडवं जात मोठाल्या धोंडय़ांवरून पोहोचलो. १० मी. उंचीचे कातळारोहण होते. सोप्प्या श्रेणीचे. दोराची गरज नाही, पण वाट निसरडी अरुंद आहे. माथ्याजवळ पोहोचल्यावर कातळातल्या खोदाईने लक्ष वेधलं. पांथस्थांना आधार देण्यासाठी कातळात कोरलेली कधीकाळी शेंदूर फासलेली मूर्ती समोर होती – बहुधा गणेशाची असेल!  जावळीत उतरण्याआधी राजांनी हा कातळ स्पर्शला असेल का, त्यांनी पुजली असेल का ही मूर्ती?

मूर्तीपाशी उभं राहून आतापर्यंतच्या चढाईचा अंदाज घेतला. ऊर धपापत होतं – निसणीच्या उभ्या चढाने आणि थेट दरे गावापर्यंत घरंगळलेल्या रौद्र निसरडय़ा डोंगरसोंडेच्या दृश्यानेही! कवी गोिवदांनी या मुलखाचं वर्णन अचूक केलंय, ‘जावळीचा हा प्रांत अशनिच्या वेलांची जाळी, भयाण िखडी बसल्या पसरूनी ‘आ’ रानमोळी’!

निसणीच्या कातळटप्प्यापासून महाबळेश्वर माथा अजूनही १०० मी. उंचावर होता. कारवीतून जाणारी, निसरडय़ा उतारावरची लाल मातीतली फुटलेली आडवी वाट आणि त्यानंतरची खडी वाट वेगाने पार केली. रानडुकराची खुरं मातीत उमटलेली. वेलीच्या जंजाळ्यातून चढत माथ्यावरच्या मोकळवनात पोहोचलो. पठार तुडवून परत झाडीत शिरण्याआधी किंचित डाव्या बाजूला बांधीव चौकोनी कोरडी बांधीव विहीर होती – इतिहासाची अजून एक पाऊलखूण! इथलं रान ‘राखीव’ घोषित केल्यामुळे थोडंफार टिकलेलं. घनदाट जंगलाचा टप्पा पार करून, वन विभागाच्या कृत्रिम पाणीसाठय़ाच्या बाजूने क्षेत्र महाबळेश्वर ते एल्फिन्स्टन टोकाजवळ डांबरी रस्त्यावर पोहोचलो.

आधुनिक जगाची विद्रूपता

निसणीमाथा ते क्षेत्र महाबळेश्वर ते महाबळेश्वर बाजारपेठ अशी आठ किमीची डांबरी रस्त्यावरची चाल आमची कसोटी पाहणार होती. जावळीच्या सुरेख ट्रेकनंतर रस्त्यावरच्या गाडय़ा आणि विद्रूप कोलाहल अंगावर आला. यंदाचं निरीक्षण म्हणजे, रस्त्याच्या दोहोंबाजूस कचराकुंडी मानणाऱ्या उपद्रवी टुरिस्टांनी विखुरले होते – बाळांचे डायपर्स!? या टुरिस्ट जमातीला जावळीतल्या तेजस्वी इतिहासाचं ना सोयरसुतक, ना त्याचा भूगोल समजावून घ्यायची इच्छा! एन्जॉय करायला थंड हवेचं ठिकाण असण्यापल्याड, जावळी तुम्हाला जगण्याची अपार ऊर्जा देईल. पण, जावळीचा इतिहास-भूगोल समजावून घ्यायची तीव्र इच्छाशक्ती पाहिजे.

जावळी अनुभवताना…

सुदैवाने फारसं डांबरी रस्त्यावरून चालावं न लागता क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणारी पाऊलवाट मिळाली. गेळाच्या, जांभळीच्या बुटक्या झुडपांच्या गच्च रानातून आडव्या धावणाऱ्या वाटेवर थबकलो, लगडलेल्या आमरीच्या झुबक्यांपाशी! पुढच्या पाच मिनिटांत पोहोचलो क्षेत्र महाबळेश्वरच्या मारुतीपाशी. हा मारुती समर्थस्थापित अकरा मारुतींच्या यादीत नसला, तरी त्याचं रूप आणि त्याचं कृष्णेकाठी असणं पाहता, हा मारुतीदेखील समर्थस्थापित असं मानतात. राजांच्या जावळी मोहिमेत क्षेत्र महाबळेश्वरचंही महत्त्व! सूर्यग्रहणाच्या पर्वणीवर आईसाहेबांची आणि सोनोपंत डबिरांची सुवर्णतुला क्षेत्र महाबळेश्वर तीर्थक्षेत्री केलेली. म्हणूनच, जावळीभेटीच्या भटकंतीच्या शेवटी आम्ही क्षेत्र महाबळेश्वरी पोहोचलो! आधुनिक जगाच्या कोलाहलात परतण्याआधी भर्राट वाऱ्यात जांभळीच्या झाडाखाली जावळीच्या भटकंतीच्या क्षणांना उजाळा देऊ म्हटलं. चंद्रराव मोरेंनी म्हणल्यानुसार ‘येता जावळी, जाता गोवळी..’ हे आजमावून बघितलेलं. इतिहासाच्या पानांमधली, दोन दिवसांच्या भटकंतीत भेटलेली जावळी मनात रुंजी घालत होती…
साईप्रसाद बेलसरे – response.lokprabha@expressindia.com