इथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगरही मीच. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच.

‘‘बागलाण! या चार शब्दांतच नाशिक जिल्ह्यच्या या भूभागाचा इतिहास डोळ्यांसमोरून तरळून जातो. काही शब्दांत एक विशिष्ट जादू असते. तो शब्द उच्चारला की इतिहास-भूगोलासोबत त्याचे वर्तमानही खुणावते. इथले डोंगर जेवढे उंच, तेवढाच या मातीचा इतिहासही गगनाला भिडलेला. किंबहुना त्याहीपेक्षा उंच. जेवढा तुम्ही वाचलेला, तुमच्या माहितीतला, कुणी तुम्हाला सांगितलेला, तुम्ही ऐकलेला, त्याहीपेक्षा जास्त मी अनुभवलेला. खरे तर माझ्यापेक्षा तो कुणाला माहीतही नसणार. इथे नांदलेल्या राजवटींपेक्षा जास्त उन्हाळे-पावसाळे झेललेला आणि इथल्या मोठमोठय़ा राजकीय संक्रमणाचा साक्षीदार मी!  इथल्या रक्तपाताचा, इथल्या युद्धजन्य परिस्थितींचा, कधीकाळी शांततेत नांदत असलेल्या आणि ऐश्वर्यसंपन्न राजवटींचा मूक साक्षीदार मी. डोलबारी रांगेतला साल्हेर-सालोटय़ानंतर सर्वात उंच डोंगर मी. बाजूलाच उभारलेल्या दोन धाकटय़ा भावांची साथ असली तरी इकडे वळणारी मानवी पावले दुर्मीळच. असो, ही माझ्यासाठी रोजचीच व्यथा. पण आज मला बोलायचेय, हा अबोलपणा सोडायचाय. कोणी ऐकेल का? त्यासाठी तुम्हाला वाट थोडी वाकडी करावी लागेल, माझ्या जवळ यावे लागेल. चला येताय ना मग ? माझ्याकडे येण्याचा रस्ताही तसा आडवळणाचा. नाशिकच्या वायव्येस साक्री-नंदुरबारकडे जाणाऱ्या गाडीरस्त्यावर ताहराबाद शहर वसलेले आहे. हे शहर पण आताचे नव्हे, सतराव्या शतकात मुघल सरदार मुहम्मद ताहिर याने वसवलेले. ताहिर हा, माझा धाकटा भाऊ  मुघलांच्या ताब्यात असतानाचा पहिला किल्लेदार. मुहम्मद ताहिर आणि त्याच्या सोबतीला असणाऱ्या सरदाराने बागलाणवर हल्ला चढवला        तेव्हा राजा बहिर्जी याचे राज्य होते. युद्धात आपला पराभव होणार हे दिसत असताना त्याने औरंगजेबाशी तह करून मुघल मनसबदारी स्वीकारली आणि साडेतीनशे वर्षे हिंदुराष्ट्र म्हणून उदयास आलेले ऐश्वर्यसंपन्न बागलाण अखेर मुघलांच्या ताब्यात गेले. इथे इतिहास भरपूर आहे, काळ-वेळ-जागा जमून आली की सांगेनच. तूर्तास ताहराबादवरून गाडी डावीकडे वळली की चार कोसांवर मुल्हेरवाडी हे एक ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व असलेले शहर वसलेले आहे. या रस्त्यावरूनच उजवीकडे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगी अन् न्हावी-रतनगडाचे आणि डावीकडे डोलबारी रांगेतल्या माझ्या दोन भावंडांचे, मोरा-मुल्हेरचे पहिले दर्शन होते. मोरागडाचा कातळकडा लक्ष वेधून घेतो. पण तोपर्यंत मी दृष्टिक्षेपात येत नाही. त्यासाठी मुल्हेरवाडीच गाठावी लागते.
मुल्हेरवाडी! वर्तमानात गावाच्या चौकातली गजबज तुमचे स्वागत करते. सकाळी सकाळी दुकाने उघडण्याची घाई करणाऱ्या वाण्यांपासून ते उकळलेल्या तेलाच्या कढईत वडे सोडणाऱ्या हातगाडीवाल्यांपर्यंत, सगळे जण लगीनघाईत असतात. पण आतापेक्षाही जास्त गजबजलेली मुल्हेरवाडी मी अनुभवलेली आहे. थोडे पुढे आलात की दोन्ही बाजूंचे थोडेच उरलेले जुनाट वाडे तुमचे लक्ष वेधून घेतील. हे वाडे फार सुंदर. नक्षीकाम केलेले. दारे-खिडक्या बघून माझ्यासोबत तुम्हीही इतिहासात हरवून जाल. तेवढय़ात एखाद्या वाडय़ासमोर तुम्हाला एखादी मुलगी अंगणात झाडू मारताना दिसते तेव्हा इथे घडलेल्या भूतकाळातील आठवणींनी मीही गदगदून जातो. मुल्हेरवाडीची ही बाजारपेठ एके काळी ऐश्वर्यसंपन्न म्हणून इतिहासप्रसिद्ध होती. सुरतेपासून दक्षिणेस जोडलेला व्यापारी मार्ग हा येथून जात असे. बाजारपेठेबरोबरच इथली टांकसाळही प्रसिद्ध होती. गुजरातच्या सुलतानाने मुल्हेर त्याच्या आधिपत्यात असताना महमुदी रुपये पाडले होते. तसेच मुल्हेरी तलवार मुठीसाठीही मुल्हेरवाडी प्रसिद्ध होती. हा झाला इतिहास, पण मुल्हेरवाडी ही काय काल-परवाची नव्हे. त्याहीआधी या वाडीचे अस्तित्व रत्नपूर म्हणून महाभारतात मिळते. महाभारतकालीन मयूरध्वज राजा इथे नांदत होता. त्याच्याच नावावरून रत्नपूरच्या या किल्ल्याला मयूरपूर असे नाव पडले आणि पुढे अपभ्रंश होत होत मुल्हेर हे नाव रूढ झाले. हाच माझा सर्वात धाकटा भाऊ. एके काळी बागलाणची शान असलेले रत्नपूर/ मुल्हेरवाडी, आता मात्र महाराष्ट्रातले कुठल्या तरी कोपऱ्यात वसलेले छोटेसे गाव म्हणून लोकांना माहीत आहे, तसेही आता इकडे फिरकणार कोण? इथली मुल्हेरी मूठ राहिली नाही किंवा बाजारपेठही नाही. आता दृष्टीस पडतो तो इथला राब राब राबणारा शेतकरी. कामगार, आदिवासी वर्ग. जिभेवर बागलाणी, फार प्रेमळ लोक. असो, तूर्तास नव्याने बांधलेला डांबरी रस्ता आणि दुतर्फा घाणीचा सडा चुकवत तुम्ही चाला. पायथ्यापासून माझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट तशी मळलेली नसल्याने वाडीतून वाटाडय़ा घेणे सोयीस्कर.
गजबजलेली वाडी मागे टाकली की डाव्या बाजूला टेकडावर एक मंदिर लक्ष वेधून घेते आणि उजव्या बाजूला एक जुनाट बांधकाम. ही कुणा एका मुघल अधिकाऱ्याची कबर आहे. ही वास्तू बरीच मोठी आहे, कळसाला गोल घुमट आहे. अशा बऱ्याच खुणा इथला भूतकाळ सांगण्याचा प्रयत्न करतात, फक्त ऐकण्याची आपली तयारी असावी लागते. थोडे पुढे सरकलो की माझ्यासोबतच माझ्या भावंडांचे तुम्हाला दर्शन होईल. आमचे त्रिकुट, अगदी एका सरळ रेषेत. मी हरगड! उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूस एकजीव झालेले मोरा-मुल्हेर! कशी वाटली ही पहिली भेट! हो. मला माहीत आहे, अगदी आडवाटेलाच आहे. पण तुम्ही जसे-जसे जवळ याल तसे कळत जाईल, जेवढी वाटली तेवढी वाट वाकडी नक्कीच नाही..’’
डांबरी रस्ता संपला. पुढय़ात पावसाळी पाणी अडवून बांधलेला बंधारा, मला दोन वर्षांपूर्वीची बागलाण मोहीम आठवून गेला. तेव्हा करायचा राहिलेला हरगड आता स्वत:हून बोलू लागला होता. पहाटे नाशिकवरून निघालो तोच हरगडाने मनावरचा ताबा घेत कथन सुरू केलं. त्याची ही दुर्गव्यथा ऐकतच आमची पायगाडी, एका आंब्याच्या झाडाजवळ थबकली. हरगडाच्या कथेला एक स्वल्पविराम देऊन विश्रांती घ्यायचं ठरवलं. यथेच्छ पोटोबा उरकला. मुल्हेर-मोरागडाचा उभा ताशीव कडा आणि उजवीकडच्या हरगडाचा ओबडधोबड आकार एकदम आव्हान देऊन गेला. स्वच्छ निळ्या आकाशात त्रिकुट मात्र उठून दिसत होतं. नारायणरावही संथगतीने मैदानात उतरत होते. पाठीमागे सेलबारी रांगेतील मांगी-तुंगीही साद घालत होते. तूर्तास लक्ष्य डोलबारी. उदरभरण आटोपून चढाईला लागलो. हरगड परत बोलू लागला.
‘‘आंब्याच्या झाडापासून मजपर्यंत पोहोचायला तुम्ही एकतर मुल्हेरमाचीवर येऊ  शकता किंवा मुल्हेर आणि माझ्यामधली जी खिंड दिसते, तिथपर्यंत सरळ उजवीकडील वाट धरू शकता. पण थोरला असलो तरीही माझे महत्त्व हे माझ्या धाकटय़ा भावामुळेच मुल्हेरमुळेच, त्यामुळे माचीवर आलात तर फार बरे. ही वाट तशी मळलेली, त्यामुळे चुकण्याचा संभव नाहीच. तसेच तुम्ही पुढे चालत राहिला की एकामागून एक अशा तीन दरवाजांचा संच तुमचं स्वागत करतो. पैकी पहिल्या दोन दरवाजांच्या कमानी पूर्णत: जमीनदोस्त झालेल्या आहेत, पडझड झालेले बुरूज आणि तट एवढेच काय ते शिल्लक. तिसरा दरवाजा मात्र चांगल्या स्थितीत आढळतो. थोडय़ाफार झाडोऱ्या वाटेतून साधारण पाऊण तासात तुम्ही मुल्हेरमाची गाठता. तिसऱ्या दरवाजाला लागूनच निघालेल्या तटबंदीने मुल्हेरमाची संरक्षित आहे, पण त्यावर आता झाडी वाढलेली आहे. पुढय़ात तुमची नजर खिळवून ठेवतो तो गणेश तलाव आणि काठावर वसलेलं गणेश मंदिर अन् त्याच्याहीमागे  पहारेकऱ्यासारखा गगनाला भिडलेला मी. आता तलावातलं पाणी जरी खराब असलं तरी गतकाळातील इथला राबता तुम्हाला काय सांगू! एकेकाळी इथल्या गणेश मंदिरात देवाधीपतींचा दिवसरात्र चाललेला जप अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. तेव्हा आतासारखी झाडी वाढलेली नव्हती. दृष्ट लागण्यासारखी संपन्न नगरी इथे नांदत होती. बागलाणचा राजा बहीरमशहा आणि त्याची राजधानी मुल्हेरवाडी. या माचीवर या पराक्रमी राजाचा भव्यदिव्य असा राजवाडा होता.
महासत्तेला साजेशी अशी ऐश्वर्यसंपन्न नगरी आणि त्यात उठून दिसणारा राजवाडा या माचीवर वसलेला होता. याच राजवाडय़ाचे अवशेष म्हणजे चौथरा आता शिल्लक आहे, बाकी इतिहासजमा. आता तुमच्या त्या वनविभागाने इथे वृक्षारोपण करून अधे-मधे विश्रांतीची सोय करून ठेवलीये. असो, काही क्षणातच तुम्ही सोमेश्वर मंदिरात पोहोचता. मंदिरात मयूरध्वजापासूनचा वंशावळ फलक लावलेला आहे. आजूबाजूला भरपूर झाडी असल्याने जागा फार प्रसन्न वाटते. आंब्याची, पिंपळाची मोठ-मोठी झाडे तुम्हाला इथे खिळवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. गतकाळात इथे शिवाची आराधना चालत असली तरी तूर्तास त्यात खंड पडलेला नाहीये. एका जटाधारी बाबाचं वास्तव्य असल्यामुळे पूजेचा दरवळ आणि स्वच्छतेचा वास इथे घुमत असतो. मंदिरामागे मुल्हेरचा बालेकिल्ला खुणावत असतो. उभ्या ताशीव कडय़ात कोरलेलं हनुमान शिल्प लक्ष वेधून घेतं. मोरागडाचा दगडात कोरलेला दरवाजाही साद घालत असतो.’’
आम्ही पोहोचलो तेव्हा साधुबाबा मंदिरावरून माची न्याहाळीत बसले होते, पाठीवरच्या सॅक जड होत्या. हरगड आटोपून मुक्कामाला इथेच यायचं तर सॅक कशाला पाहिजे?
‘‘अहो बाबा, बॅगा ठेवू का इथे?’’
‘‘रख दो बेटा. बस अपना कीमती सामान साथ लेकर जाना, और अच्छेसे बांध के जाना. नही तो ये बंदर छोडेंगे नही कुछ.’’
माकडं, अरेच्चा.
‘‘बाबा, आपके खोली मे रखे?’’
‘‘नही, नही बाहर रखना है तो रखो, नही तो साथ मे लेके जाओ. वहा, मुझे रहने के लिये जगह नही’’ जणू आम्ही बॅगा टाकून त्या खोलीवर कब्जाच करणार होतो. सुदैवाने मंदिरात एक प्लास्टिकचा रिकामा ड्रम मिळाला अन् त्यात आमच्या सॅक कोंबून पायगाडी एकदाची चालती झाली. मागच्या पानावरून पुढे हरगड पुन्हा बोलता झाला.
‘‘चला, इथून निघालो की झाडीतली छोटी पायवाट तुम्हाला माझ्याकडे घेऊन येते. वाटेत मुल्हेरमाचीवरील हत्ती आणि मोती तलावातल्या मधुर पाण्याने तुमच्या पाणपिशव्या भरून घ्या, कारण माथ्यावर पोहोचेपर्यंतमध्ये पाणी नाही. पायवाटेने चालत आला की उत्तरेस कमालीच्या ढासळलेल्या अवस्थेत एक दरवाजा आहे, तो ओलांडला की तुमचा प्रवेश माझ्या हद्दीत झाला म्हणून समजायचे आणि चालत सुटायचे, थोडय़ाच वेळात खिंड दिसेल जी, वाडीतून खुणावत असते. येथून पलीकडे नरकोल आणि शेजारील बंधाऱ्याचे सुंदर दर्शन होते. नरकोल गावातून येणारी वाटही आपल्याला इथे भेटते. सपाटीला चालत गेलो की पुढय़ात एक भलामोठा वृक्ष आपली वाट पाहत असतो, त्याच्या सावलीत किंचित विसावून उजवीकडे चढाईला लागायचे. समोर दिसणारी नाळेसारखी वाट आपल्याला चढायची असते. किल्ल्यावर पोहोचायला ही एकच वाट नसून अजून दोन आहेत, माथा गाठला की सांगेनच. तूर्तास छोटय़ा-मोठय़ा दगडांच्या राशी पायाखाली तुडवणे हा एकच पर्याय. जसे-जसे पुढे जाल तसातसा मोरा-मुल्हेर आपलं रूपडं नजर करीत असतो. या वाटेत, माथ्यावर पोहोचेपर्यंत तीन दरवाजे लागतात. दुर्दैवाने तिघांचीही अवस्था दयनीय आहे. बुरुज कसेबसे तग धरून आहेत. पहिला दरवाजा ओलांडला की कडय़ात विसावलेल्या हनुमंताचे दर्शन घेऊन पुढे चढत राहायचे. तिसऱ्या दरवाजातून तुम्ही एकदम माझ्या खांद्यावरच येऊन पोहोचता. अगदी वर दिसणारे निळेभोर आकाशही ठेंगणे झालेले असणार. चला आता मी तुम्हाला माझी सैर घडवून आणतो.
पुढय़ातल्या महादेवाच्या मंदिरापासून सुरुवात करूया. ऊन-वारा झेलत उभं राहिलेलं गडावरचं हे एकमेव बांधकाम. त्यासमोरच उभ्या अवस्थेतला मारुतीराया आणि त्याच्याच पुढय़ात एक भलामोठा तोफगोळा आपली उत्सुकता वाढवतं. अर्थातच माझ्या एका खांद्यावर एक ऐतिहासिक खूण दडलेली आहे, ती आपण बघूच. तूर्तास मंदिरामागचं विस्तृत पठार तुमच्या पायांना मोकळं करून चालत राहा. महामूर पावसाने तृप्त झालेली झुडपे, उन्हामुळे करपून सोनेरी रंगात न्हाऊन निघाली आहे. ती तुडवत, चहुबाजूंचा बागलाण नजरेत भरवत इतिहासाचा मागोवा घेऊ . मुल्हेरसारखं बांधकाम माझ्या अंगावर नव्हतं, जो काय राबता तो मुल्हेरमाचीवर. पण इथल्या पडक्या अवशेषांवरून थोडीफार वर्दळ होती, हे सिद्ध होतं. मुल्हेर ही बागलाणची राजधानी आणि मी त्याचा रक्षकदुर्ग. मला घडवलाय तो बागुलवंशीय पिढय़ांनी. राजा बहीरमशहाच्या कारकीर्दीतली एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. मुघलांच्या ताब्यात जाण्याअगोदर बहीरमशहाच्या अमात्यपदी असलेल्या काशीराजांवर औरंगजेबाशी फितूर झाल्याचा आळ आला, पण त्यात काही तथ्य नाही हे नंतरच्या काळात सिद्ध झाले. काशीराजांना पुन्हा अमात्यपद देण्यात आलं, पण त्यांनी ते नाकारून राजकारण सोडलं आणि इथे येऊन गणेशाची आराधना करू लागले. नंतरच्या काळात बागलाण मुघलांच्या ताब्यात गेला. मुल्हेरच्या सोबतीला माझ्यावरही परकीयांचा अंमल सुरू झाला, तो पुढची चाळीस वर्षे. त्यानंतर मात्र कमाल झाली. १६७२ मध्ये शिवरायांच्या प्रतापराव आणि मोरोपंत पिंगळे या दोन मराठा सरदारांनी मला स्वराज्यात दाखल करून घेतले. आणि पुन्हा एकदा माझ्या मस्तकावर भगवा डौलाने फडकू लागला. एकोणिसाव्या शतकात, बाकीच्या किल्ल्यांप्रमाणे माझ्यावरही इंग्रजाळलेला वरवंटा फिरायला विसरला नाही. तूर्तास पडक्या भिंती, वाडे आणि उद्ध्वस्त दरवाजे एवढाच काय तो माझा वर्तमान. असो, काळाच्या ओघात हे आलंच.
उजवीकडे हरणबारी आणि चहुबाजूंनी डोंगरांची ओळखपाळख आटोपून शेवटच्या टोकापर्यंत गेलो की, दूरवर अस्पष्ट अशा साल्हेर अन् सालोटय़ाचं दर्शन होतं. ही दोघं डोलबारी रांगेचे मानकरी, आमचे थोरले बंधू. येथून अगदी भीमाच्या बोटांपासून संपूर्ण परिसर डोळ्यात भरतो. इथल्या कातळात कोरलेल्या टाक्यातले पाणी पोटात रिचवून परतीला लागायचे. वाटेत तलावाचे घडीव बांधकाम लक्ष वेधून घेते, पण कोरडा. त्याच्यापलीकडे मात्र एक चोरदरवाजा आणि त्यातून खाली उतरू शकलो तर अजून एक दरवाजा. पण खालच्या दरवाजापर्यंतची वाट पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. तो बघून आपण परत मंदिराकडे वळूयात. मघाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या खांद्यावर एक ऐतिहासिक खूण आहे, जी मला मुल्हेर गडाचा संरक्षक दुर्ग म्हणून सिद्ध करते, ती म्हणजे १२ फुटी हजारबगादी तोफ! या तोफेच्या माऱ्यात मुल्हेरमाचीच नव्हे तर समोरच्या मुल्हेरवाडीपर्यंतचा भाग येतो. मिश्रधातूंची ही तोफ अगदी योग्य जागी ठेवली आहे, कारण माझी उंची जास्त असल्याने मुल्हेरचा बालेकिल्लाही या तोफेमुळे एकदम सुरक्षित आहे. तोफेसमोरच तिला फिरवण्यासाठीची सोय केलेली आढळते. तोफेचं कौतुक करून उजवीकडे थोडं खाली उतरलात की अजूनही बांधकाम मजबूत असलेला महादरवाजा तुम्हाला स्तिमित करून सोडेल, याची खात्री देतो.’’ एवढं बोलून हरगड अंतर्धान पावला.
उद्ध्वस्त देवडय़ांचे चौथरे, खाली उतरत जाणाऱ्या खणखणीत पायऱ्या आणि टिकून राहिलेलं बऱ्यापैकी दरवाजाचं बांधकाम हे बघून दिल तो एकदम खूश हो गया. कमाल! हरगडाची सफर सार्थकी लागल्याचा आनंद गगनात मावत नव्हता. नक्षीदार कमान, रेखीव दगडी बांधकाम याचं कितीतरी वेळ आम्ही निरीक्षण करत होतो. वरच्या देवडय़ांमध्ये एक शिलालेखदेखील आढळतो. ही वास्तू अजूनही टिकून असली तरीही बाजूच्या झाडांची मुळे दगडांमध्ये घुसली आहे, त्यामुळे दरवाजाला फार मोठा धोका निर्माण झालाय. वेळेवर लक्ष नाही दिलं तर हरगडावरील सुस्थितीतलं हे एकमेव बांधकाम जमीनदोस्त व्हायला वेळ नाही लागणार. आणि ह्य दरवाजा-मुळेच गडावरील सावलीचं हे एकमेव ठिकाण. त्यामुळे पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना चांगलाच वाव मिळाला होता. घरून आणलेल्या थालीपीठावर ताव मारून आम्ही उतरायला सुरुवात केली.
हा महादरवाजा असल्यामुळे गतकाळात गडावर येण्याचा हा राजमार्ग होता, पण आता वाट बरीच निसरडी आणि पायऱ्या तुटलेल्या असल्याने वापरात नाही. पण सोबतीला असलेल्या मुल्हेरवाडीतल्या राजूदादाने वाट असल्याची हमी देऊन आम्हाला मागे-मागे येण्याचा सल्ला दिला. आम्ही सुरुवात तर केली, पण थोडय़ाच वेळात या राजमार्गाने रंग दाखवायला सुरुवात केली. मात्र हळूहळू, सावध पावले टाकत, कुठे झाडीचा आधार घेत एकदाचं आम्ही खालच्या सपाटीला लागलो तेव्हा हुश्श करीत दगडावर बसकणच मांडली. समोरच्या डोंगरधारेवरची ही वाट आम्ही उतरून आलो, याचंच कौतुक वाटून गेलं. नारायणराव पश्चिमेकडे कलत होते, आमचं या मोहिमेतलं आजचं लक्ष्य संपलं होतं. बऱ्याच दिवसांपासून मनात घर करून राहिलेलं बागलाणचं हे उपेक्षित दुर्गलेणं एकदाचं सर झालं. एकंदरीत दिवस सत्कारणी लागला. सोमेश्वर मंदिरात पोहोचेपर्यंत माचीवरील रामेश्वर मंदिर, अस्ताव्यस्त पडलेली एक तोफ, गुप्त दरवाजा, विहिरी, इत्यादी बघून झालं.
गणेश मंदिरात पोहोचलो तेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली होती. चूल पेटली. चुलीत भाजलेल्या वांग्यांचा खमंग दरवाळायला लागला, तव्यावरील भाकरीही खरपूस भाजल्या जाऊ  लागल्या. चुलीतून बाहेर काढलेल्या निखाऱ्यावर पापड पुटपुटत होते, कोशिंबिरीचा तडकाही लाजवाब. भरीस भर म्हणून तव्यावरची मीठ घालून केलेली ढोबळ मिरची. क्या बात है सई, जियो! रोहनने मंदिरातल्या पणत्यांमध्ये तेल ओतून गाभारा उजळवून टाकला. मी आणि अमीन आळीपाळीने चुलीतला जाळ सारखा करत होतो. पण प्रसंगी डोळ्यातून पाणी काढून चुलीत मारलेली फुंकर वाया थोडीही ना जाणार. दिवस संपल्यावर आमच्या पुढय़ात होते साग्रसंगीत जेवणाचे रसरशीत ताट आणि सोबतीला होते आशाताईंचे नक्षत्रांचे देणे अन् गाभाऱ्यातला मिणमिणता प्रकाश! अजून काय हवंय आयुष्यात!!
संदीप वडसकर
response.lokprabha@expressindia.com

A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
girlfriend who murder lover
कोल्हापूर : प्रियकराचा खून करून मृतदेह जाळणाऱ्या प्रेयसीसह आरोपींच्या हातात बेड्या; आजरा पोलिसांची दमदार कामगिरी