* वर्षांऋतू जेवढा लोभस, भटकण्यासाठी पाय खेचणारा तेवढाच परावलंबी, असुरक्षित.
* कुठलाही ट्रेक-सहलीला जाण्यापूर्वी त्या स्थळाची, ट्रेकची, त्याच्या वाटा-चढाईची पूर्ण माहिती घ्यावी. अज्ञात ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक, माहितीपुस्तक घेऊनच बाहेर पडावे.
* पाऊस, ढग, वारा यामध्ये रस्ता चुकण्याचा, घसरण्याचा मोठा धोका असतो.
* धबधब्याखाली भिजण्याचा मोह अनेकांना होतो. पण या धबधब्यांमध्ये पाण्याबरोबर छोटे-मोठे दगडही अंगावर पडून अपघात होतात.
* ओढे-नाले आणि धबधब्यातील पाण्याचा वेग आणि खोलीचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहून जाण्याच्या दुर्घटनाही घडतात.
* प्रवास सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने असेल तर वेळापत्रक लक्षात ठेवा आणि स्वतंत्र वाहन असेल तर आवश्यक दुरुस्ती साहित्य बरोबर बाळगा.
* मुक्कामी ट्रेक असल्यास निर्जन स्थळी, उघडय़ावर मुक्काम करण्याऐवजी जवळच्या वस्तीवर सुरक्षित घरी किंवा मंदिरात मुक्काम करावा. झोपताना रद्दी/कागद घालून त्यावर अंथरूण घातल्यास जमिनीतील ओल लागत नाही.
* ट्रेक करताना पायात कापडी किंवा खेळाचे बुट घालावेत. चप्पल, सँडलवर ट्रेक करू नयेत.
* सॅकमधील सर्व सामान एखाद्या मोठय़ा प्लास्टिक बॅगमध्ये घेतल्यास त्याला ओल लागत नाही. कॅमेरा, लेन्स, मोबाईल, चार्जर यांची विशेष काळजी घेत त्यांना कोरडय़ा सुती कापडात गुंडाळून घ्यावे.
* आडवाटेवरचे ट्रेक करताना आपल्याबरोबर दोरी, टॉर्च, काडेपेटी, मेणबत्ती, पॅकफूड, आवश्यक औषधे आणि नाव-पत्ता-संपर्क क्रमांक-रक्तगट असलेले ओळखपत्र घेण्यास विसरू नये.
* मद्यपान, कर्कश गाणी, धिंगाणा टाळा. स्थानिक नागरिकांशी सौजन्याने वागा. त्यांच्या समस्या जाणून घ्या. जमल्यास त्यांच्यासाठी आणि तिथल्या निसर्ग-पर्यावरणासाठी काही मदत करा.
* शेवटी सर्वात महत्त्वाचे.. कुठल्याही स्थळी गेला तरी तिथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद जरूर घ्या; पण त्याच्यातील हस्तक्षेप, प्रदूषण टाळा! निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय मागे काही ठेवू नका आणि गोड आठवणींशिवाय इथून काही घेऊन जाऊ नका.