गडकोटांच्या संवर्धनाचा ध्यास घेतलेल्या ‘शिवकार्य गडकोट मोहिमे’च्या वतीने नुकताच नाशिक जिल्हय़ातील चंद्राई किल्ल्यावर वृक्षारोपण आणि बीजारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत गडावर विविध भागांत वड, पिंपळ, उंबर, सीता अशोक, करंज, चिंच आदी तीनशेहून अधिक वृक्ष लावण्यात आले. तसेच विविध वृक्षांच्या बियांचे रोपणही करण्यात आले. संस्थेतर्फे गडावर लावण्यात आलेल्या या वृक्षांचे जतन केले जाणार आहे. ‘गडकोट मोहिमे’तर्फे खैराई, वाघेरा, देहरी, रामशेज, हातगड, भास्कर,
हरिहर, रांजणगिरी, विश्रामगड, मार्केडय, कांचन, मंचन, अंकाई-टंकाई, धोडप, राजदेहर, इंद्राई आदी
किल्ल्यांवर साफसफाई, वृक्षारोपण आदी स्वरूपाची दुर्गसंवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. या जोडीनेच संस्थेतर्फे व्याख्याने, भित्तिचित्रे, एकपात्री प्रयोग आदी माध्यमांतून समाजात दुर्गविषयक जागरण केले जात आहे.