लोहगड-विसापूर ही एक अजोड दुर्ग जोडगोळी. इतिहास आणि भूगोलाने नटलेली. या गडांवर गेलो, की इंद्रायणी, पवनेचे सारे खोरे नजरेपुढे नाचू लागते. यातीलच लोहगडावर आज जाऊयात..

इंद्रायणी, पवनेच्या खोऱ्यात हिंडू लागलो, की लोहगड-विसापूर या जोडगोळीला वगळून चालतच नाही. त्यातही लोहगडाचे महत्त्व थोडे काकणभर अधिकच! अजोड, बेलाग बांधणी व वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे लोहगडाचे ‘दूरदर्शन’च आकर्षित करणारे. यामुळे गडदुर्गाच्या वाऱ्या करणाऱ्यांबरोबरच इथल्या तटा-दगडांचा अभ्यास करणाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच पावले नित्य अंतराने या गडावर उमटत असतात.
या दुर्गवारीसाठी पुणे-लोणावळा लोकल मार्गावरील मळवली स्टेशनवर उतरावे. गडावर जाण्यासाठी दोन पायांची अकरा नंबरची बस इथूनच सुरू होते. सुरुवातीलाच एका पुलावरून आपण नवा द्रुतगती महामार्ग ओलांडतो. हे भन्नाट धावते जग काळजाचा ठोका चुकवते. पुढे वाटेत भाजे गाव लागते. स्वत:चे वाहन असेल तर पुणे-मुंबई हमरस्त्या मार्गे या गावापर्यंत येता येते. या गावातून एक वाट डावीकडे भाजे लेणी आणि विसापूर किल्ल्याकडे, तर उजवीकडील वाट भातखाचरांच्या कडेकडेने लोहगडाकडे जाते.
लोहगड-विसापूर दरम्यान जेमतेम एक-दोन किलोमीटरचे सरळ अंतर आहे. यामुळे दोन्हींच्या मध्ये एक खिंडच तयार झाली आहे. या खिंडीला ‘गायमुख खिंड’ म्हणतात. या खिंडीत पोहोचेपर्यंत आपण विसापूरकडेच जात आहोत असे वाटत राहते. पण खिंड गाठली, की आपला अमेरिकेच्या शोधात निघालेला कोलंबस झालेला नाही हे कळते. या खिंडीनंतर विसापूर मागे ठेवत वाट लोहगडाच्या पायथ्याच्या लोहगडवाडीकडे निघते.
या वाटेवर चार पावले चाललो नाही तो एक स्मारक आपली वाट अडवते. घोडे, उंट, हत्ती, अशी नऊ शिल्पे धारण केलेले हे स्मारक ‘कापला’ म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात, लोहगडाच्या कोणा एका बादशाहाने एकदा या दोन गडामधील अंतर दोरीवरून पार करण्याची स्पर्धा लावली. लोहगडाच्या या बाजूला एक नेढे आहे. (नेढे म्हणजे डोंगराला पडलेले छिद्र) या नेढय़ातून ओवलेला दोर त्याने समोर विसापूरच्या तटाला बांधला. जो कोणी हे अंतर या दोरावरून पार करेल त्याला अर्धे राज्य इनाम म्हणून जाहीर केले गेले. मग काय, एका साहसवेडय़ा मावळय़ाने हा विडा उचलला आणि जवळजवळ स्पर्धा जिंकत आणली. बादशाहाला आता आपल्या जाहीर इनामाची काळजी वाटू लागली. त्याने दोर कापला आणि तो वीर या खिंडीतच पडून मरण पावला. तो जिथे पडला तिथे त्याचे स्मारक करण्यात आले. ..हे स्मारक आणि वर झाडीत दिसणारे नेढे एकदा पाहायचे आणि मग इतिहास रंजक करणाऱ्या या लोककथांना धन्यवाद देत वाडीकडे सरकायचे.
लोहगडवाडी, गडाची ही एकेकाळची बाजारपेठ. यामुळे गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी, मंदिरे दिसतात. वाडीतील उपस्थित गावक ऱ्यांना ‘राम राम’ करायचा आणि पुढे निघायचे. गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. लोहगडाचा अद्वितीय असा प्रवेशमार्ग यापैकीच एक! सर्पाकार मजबूत तटबंदीतला हा प्रवेशमार्ग चार दरवाजांमधून जातो. ‘गणेश’, ‘नारायण’, ‘हनुमान’ आणि ‘महादरवाजा’ या अनुक्रमाने येणाऱ्या चार दरवाजांपैकी ‘हनुमान’ तेवढा मूळचा. बाकी सर्व नाना फडणविसांनी इसवी सन १७९० ते १७९४ या कालावधीत बांधलेले. या आशयाचा एक शिलालेखच गणेश दरवाजावर बसवलेला होता. सध्या तो नारायण दरवाजानंतर येणाऱ्या पहारेक ऱ्यांच्या एका खोलीत ठेवलेला आहे. तो याप्रमाणे-
‘श्री गणेशाय नम:
गणेश दरवाजा बा (बां)
धला बाळाजी जनार्दन फडणीस विद्यमान धों
डो बल्लाळ नीतसुरे प्रारंभ शके १७१२
साधारण नाम संवत्सरे अस्वीन शु
ध ९ नवमी रवीवार समाप्त शके
१७१६ आनंदनाम संवत्स
रे ज्येष्ठ सुध त्रयोदशी बु
ध वार कता(र्त) व्य जयाजी
धनराम गव(वं)डी त्रिवकजी सुतार.’
या लेखाच्या खाली दिव्यासाठी एक कोनाडासुद्धा कोरलेला आहे. जणू तो दिवा लावला, की वरच्या या कर्तृत्वावर आपोआपच प्रकाश पडणार! किती सुंदर कल्पना!
नारायण दरवाजाच्या दोन्ही बाजूस ‘शरभ’ या काल्पनिक पशूची शिल्पं बसवलेली आहेत. सिंहासारखा दिसणारा हा काल्पनिक पशू! एकाच्या माथ्यावर दुसरा अशा रीतीने हे चारही दरवाजे रचले आहेत. प्रत्येकाला तटबुरुजांनी जोडलेले आहे. या तटबुरुजांवर फिरण्यासाठीही स्वतंत्र वाट ठेवली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या आणि खिडक्या ठेवल्या आहेत. हे अंगावर येणारे दरवाजे, लढाऊ तट-बुरूज आणि त्यातून वळणावळणाने वर चढणारा घडीव दगडांचा मार्ग, हे सारे पाहिले, की मराठय़ांच्या या स्थापत्यकलेचे कौतुक वाटते. लोहगडाच्या या प्रवेशमार्गाचे जतन होणे आवश्यक आहे.
इसवी सन १८९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकात लोहगडाच्या या चारही दरवाजांची ती भरभक्कम दारे शाबूत असल्याचा उल्लेख आहे. यातील गणेश दरवाजावर तर अणकुचीदार खिळेही ठोकलेले होते. याशिवाय या परिसरात काही तोफाही असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. पण आज यातील एकही दरवाजा तर दूरच, पण त्याची एखादी फळी किंवा खिळाही इथे नाही. तसेच इथे असणाऱ्या त्या तोफांनाही पाय फुटले आहेत.
लोहगडाच्या या प्रवेशमार्गाचे दडपण झेलतच गडात प्रवेश करावा. महादरवाजातून आत शिरताच समोर एक मुस्लिम धाटणीची इमारत दिसते. औरंगजेबाच्या मुलीची कबर म्हणून दाखवली जाते. पण इतिहास याबाबत काहीच बोलत नाही. या इमारतीला लागूनच गडाची सदर आणि लोहारखान्याच्या इमारतीचे अवशेष आहेत. याच्यामागे टेकडीवर चारचौकी मोठी सदर, किल्लेदाराचा उद्ध्वस्त वाडा आहे. यामागे खडकाच्या पोटात तीन-चार गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. याच्या आणखी उजव्या बाजूस एका पाठोपाठ दोन विस्तीर्ण लेणीवजा गुहा आहेत. यातली पहिली गुहा खजिनदाराची, तर दुसरी लोमेशऋषींची म्हणून ओळखली जाते. या गुहांसमोरच दोन तोफाही ठेवल्या आहेत. याच्यापुढे वर गेल्यावर एक कबर लागते. इथून समोरचा विसापूर अगदी हाकेच्या अंतरावर दिसतो. जणू अगदी आकडी लावून विसापूरवरची एखादी वस्तू अलगद उचलावी असा. उंची आणि भव्यतेने आलेली ही जवळीकता. मग या जवळिकतेतूनच पुढे कितीतरी वेळ विसापूरला न्याहाळले जाते. शेवटी पुढच्या वेळी विसापूरला नक्की जायचे असे ठरते आणि पावले पुढे निघतात.
पुन्हा मुख्य वाटेवर आलो, की एक विस्तीर्ण बारव दिसते. नाना फडणविसांनी ही बांधली. या आशयाचा एक अस्पष्ट झालेला शिलालेख आत उतरणाऱ्या पायरीमार्गावरच आहे. या तळय़ाची एक बाजू खजिन्याच्या लोभापायी इंग्रजांनीच फोडली. त्या वेळी त्यांना खजिना मिळाला की नाही हे माहीत नाही, पण या लोभापायी खरा ‘खजिना’ (पाणी) मात्र वाहून गेला आणि हे तळे कायमचे कोरडे झाले. या तळय़ालगत पुन्हा एक छोटीशी विहीर आहे, तिचे पाणी मात्र कायम लक्षात राहणारे आहे. इथेच त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिरही आहे. आता आपण गडाच्या पश्चिम टोकावर येतो. इथेच ती लोहगडाची लांबलचक सोंड आपल्या पुढय़ात येते. लोहगडावर येताना खालपासून ही सतत खुणावत असते. लोहगडाच्या भूरचनेतील हा आगळावेगळा भाग. राजगडाला जशी सुवेळा- संजीवनी माची, तोरण्याला जशी झुंजार-बुधला माची तशी लोहगडाची ही विंचूकाटा माची. विंचवाच्या नांगीप्रमाणे बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारी!
या माचीवर या साऱ्या प्रदेशाच्याच संरक्षणाची जबाबदारी. यासाठी तिला तटबुरुजांनी आणि दूरवर मारा करणाऱ्या तोफांनी सज्ज ठेवलेले आहे. समोरच्या बोरघाटावरच जणू ती नजर ठेवून असते. खरेतर या मार्गाच्या संरक्षणासाठीच हा गड बांधला. आजचा हा बोरघाट कधी सातवाहनांपासून व्यापारासाठी वाहता आहे. त्याच्या संरक्षणासाठीच लोहगड-विसापूर जोडीची निर्मिती झाली. मग यातील विसापूरच्या पोटात पुढे भाज्याच्या लेण्यानेही आकार घेतला. लोहगड-विसापूरवरील गुहा आणि अन्य खोदकामेही त्या वेळेचीच! विसापूरवरील एका टाक्यावर तर त्या काळातील ब्राह्मी लिपीतील एक लेखच आहे. एकूणच या दोन्ही गडांच्या वाटचालीला आता दोन हजार वर्षे उलटून गेली. यानंतर चालुक्य, राष्ट्रकू ट, यादव या राजवटीही गडाने अनुभवल्या आणि त्यानंतरचा यवनांचा गुलामीचा काळही सोसला. या नंतर थेट इसवी सन १६४८ मध्ये शिवरायांनी इथल्या आदिलशाहीला हुसकावून लावत लोहगड स्वराज्यात आणला आणि दुरुस्ती करत बुलंद केला. पुढे इसवी सन १६६४ मध्ये सुरतेवरून आणलेली लूट याच बेलाग किल्ल्यात सुरक्षितपणे उतरवली. लोहगडाचे हे महत्त्व जाणूनच मिर्झाराजे जयसिंह यांनी हा गड तहातून मुघलांकडे आणला आणि पुढे पाचच वर्षांनी १३ मे १६७० रोजी मराठय़ांनी तो पुन्हा जिंकला.
पेशवाईत तर या गडाचे महत्त्व अधिक वाढले. त्यातही नाना फडणविसांचा या गडाबरोबरच या साऱ्या प्रदेशावरच खूप जीव होता. त्यांनी या गडावर जशी नवनवी बांधकामे केली तशीच गडाच्या दक्षिण पायथ्याला आंबेगावात एक मोठा वाडा बांधला. पवना नदीस घाट घातला. त्यावर महादेवाचे एक कळशीदार मंदिरही थाटले. वाईच्या मेणवलीची आठवण करून देणारे हे चित्र होते. हे सारे होते, असे अशासाठी सांगतो, कारण पवनेवर धरण झाले आणि या आंबेगावाबरोबरच हे सारे वैभव पाण्याखाली गेले. लोहगडावर उभे राहून हा सारा इतिहास शोधू लागलो, की मग मन त्या पवनेच्या पाण्यात खोलवर जाऊन बुडते.
गडाच्या या भागातून आंदर आणि पवन मावळाचा मोठा भाग नजरेत येतो. पवनेचे विशाल पात्र आणि त्या मागची तुंग-तिकोन्याची दुर्गशिखरे खुणावतात. संध्याकाळी तर या साऱ्या भागालाच जणू एक झळाळी येते. इथली खेडी, रस्ते, शिट्टय़ा मारत धावणारी रूळवाट, भातखाचरे, डोंगर, चमचमते पाणी घेत वाहणाऱ्या नद्या असे सारेच विलोभनीय वाटू लागते. ..या विंचूकाटय़ाच्या मधोमध पाण्याचे एक टाके आहे. संध्याकाळच्या सोनेरी किरणांमध्ये हे टाकेही जास्त उठून दिसते. एवढय़ाशा तळय़ात मावळतीचा सूर्य डोकावू पाहतो. वस्तू लहान असो की मोठी, ती योग्य ठिकाणी असली की तिचे मोल खूपच वाढते, असाच काहीसा हा अनुभव!

Tadoba Tigress, K Mark, Cubs Captured, Camera Quenching , Thirst in Summer Heat, tadoba sanctuary, vidarbh tiger, video of tiger, video of cub, viral video, wild life, marathi news,
video: तहानेने व्याकुळलेली वाघीण तिच्या बछड्यासह थेट तलावावर
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
dombivli marathi news, pedestrian bridge on railway line
डोंबिवलीतील गणपती मंदिराजवळील रेल्वे मार्गावरील पादचारी पूल धोकादायक; १ एप्रिलपासून डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडे जाण्याचा मार्ग बंद
Loksatta Chaturang The world of birds wandering in the wilderness Interesting
मनातलं कागदावर: लोभस हा इहलोक…!