वसंत ऋतूच्या आगमनाचा संदेश सर्वात अगोदर झाडांच्या बहरातून आम्हाला मिळतो. बहराच्या या रंगात पांगारा, पळसाच्या जोडीने फुललेला हा काटेसावर! काटेसावर अथवा शाल्मली नावाने ओळखला जाणारा हा वृक्ष. साधारण तो २० ते २५ मीटपर्यंत उंच वाढतो. काटेसावरीची साल आणि मुळांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. या झाडाचे फळ मोठे असते. त्यातून अत्यंत मुलायम असा कापूस मिळतो. ज्याचा उपयोग गाद्या आणि तक्के करण्यासाठी केला जातो. शिशिर ऋतूत या वृक्षाची पूर्ण पानगळ होते आणि मग वसंत आला की, या उघडय़ा फांद्यांमधून असंख्य लालबुंद फुले उमलू लागतात. लाल बुंद पाकळय़ा आणि मधोमध असंख्य पू-स्त्री केसर. सावरीचे झाड या फुलांनी बहरले, की त्याच्या या सौंदर्याची भूल कीटकांपासून ते नाना जातींच्या पक्ष्यांपर्यंत साऱ्यांनाच पडते. या फुलांमधील मकरंद टिपण्यासाठी असंख्य कीटक प्रथम येतात, त्यापाठी मधमाशाही आपली हजेरी लावतात. यानंतर पक्ष्यांची शाळा इथे या काटेसावरीवर भरू लागते. यातील कोतवाल, वेडा राघू, चष्मेवाला, टोपीवाला, हे कीटक खाण्यासाठी तर ही फुले आणि फुलातील मकरंद मटकावण्यासाठी शिंजीर, टकाचोर, पोपट, ब्राह्मणी मैना, जंगल मैना, राखी कोतवाल, गुलाबी मैना, बुलबुल असे पक्षीगण इथे या सावरीवर घुटमळू लागतात. सह्याद्रीत डोंगरशिखरांवर, आमच्या अनेक गडकोटांवर, अगदी गावाशिवारातही या काटेसावरीचे अस्तित्व दिसते. अशाच साताऱ्याजवळील अजिंक्यतारा गडावर फुललेल्या काटेसावरीचे हे सौंदर्य!मिलिंद हळबे milind.r.halbe@gmail.com