केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला. या परीक्षेत रक्षा गोपाळ, अजय राज, कॅन्सरवर मात केलेला तुषार ऋषी यांनी अभूतपूर्व यश मिळवले, त्यांच्या यशाचं कौतुकही देशभर होत आहे. पण या निकालाच्या वेळी जुळ्या बहिणींच्या निकालाने सगळ्यांना अगदी आश्चर्याचा धक्का दिलाय. या जुळ्या बहिणींना परीक्षेत अगदी सेम टू सेम गुण मिळालेत. विश्वास बसत नाहीये ना? अनेकांचं असंच झालं होतं. चंदीगढमध्ये राहणारी नेहा गोयल आणि तनया गोयल अशी या बहिणींची नावं असून, नेहाला ९८. ६ टक्के तर तनयाला ९८. ४ टक्के एवढे गुण मिळालेत.

वाचा : कॅन्सरग्रस्त मुलाने बारावीत मिळवले ९५ % गुण

नेहा आणि तनयाला आपल्या निकालाबद्दल फार आश्चर्य वाटलं नाही. कारण लहानपणापासून आम्हा दोघींनाही एकसारखेच गुण मिळत आल्याचे दोघींनी ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना सांगितले. दोघीही बहिणींमध्ये नेहमीच स्पर्धा असायची, दोघीही एकाच खोलीत बसून अभ्यास करायच्या, या दोघींचीही अभ्यास करण्याची पद्धतीही खूप वेगळी होती. तेव्हा बारावीच्या परीक्षेत कोण जास्त गुण मिळवेल याकडे त्यांच्या शिक्षकांपासून ते कुटुंबियांपर्यंत सगळ्यांचं लक्ष लागून होतं. रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर दोघींनाही समान गुण मिळालेले पाहून कुटुंबियांना आनंद झाला आणि तेवढंच आश्चर्यही वाटलं. नेहा आणि तनया दोघींनाही पुढे जाऊन नागरी सेवेत रुजू होण्याची इच्छा आहे.