मानवानं यंत्रमानवाची निर्मिती केली. यंत्रमानवाच्या येण्याने आपली कामं सोपी झाली. कोणतंही कामं चुटकीसरशी होऊ लागली. याचा फायदा आपल्याला झाला पण त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. अवघड कामं सोपी झाली, कामं वेगात आणि वेळेच्या आधीच पार पडू लागली. मनुष्यबळ वाचलं. पण हे सगळे फायदे होत असताना कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा आली. दहा माणसांचं काम यंत्रमानव एकटा करू लागला. त्यामुळे माणसं बेरोजगार झाली. भविष्यात जर हे असंच सुरू राहिलं तर जगातील सर्वाधिक लोकांवर बेरोजगारीचं संकट कोसळेल, अशी भाकितं कित्येकांनी वर्तवली.

वाचा : आनंद महिंद्रांनाही आवडली या माणसाची ‘डोकॅलिटी’

तेव्हा यंत्रमानवामुळे माणसाला फायदा झाला की तोटा? यंत्रमानव माणसांची जागा घेऊ शकतो का? अशा अनेक प्रश्नांवर वाद पाहायला मिळतो. या विषयावर अनेक मतमतांतरे आहेत. महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर करून या वादावर सडेतोड उत्तर दिलंय. ”कुत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रमानवा, तुला असं वाटत असेल की तुझ्यामुळे आम्ही बेरोजगार होऊ शकतो, तर पुन्हा एकदा विचार कर, तुला आम्ही सडेतोड उत्तर देऊ’ असं लिहित त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात जगातील काही माणसं यंत्रमानवाच्या वेगानं काम करताना पाहायला मिळत आहेत. ते ज्या वेगाने काम करत होते त्याला तोड नव्हती.

यंत्रमानव आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे देशभरातील कोट्यवधी लोकांवर बेरोजगार होण्याची वेळ येईल, असे विविध कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमात बिल गेट्स यांनीही यंत्रमानवाचा वापर करणाऱ्या कंपन्यांवर सरकारनं मोठा कर लावावा, असा सल्लाही दिला होता.