बंगळुरूमध्ये राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेने पतीसोबत झालेल्या एका किरकोळ वादातून आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले आहे. पतीला तिने तयार केलेले सांबार आवडले नाही यावरून तिच्यात आणि पतीमध्ये किरकोळ वादावादी झाली, यातून संतापलेल्या नागरथ्ना नावाच्या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागरथ्नाच्या पतीला काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरूणालाच खिळून होते. नागरथ्ना त्यांची सेवा करायची. पण, अंथरुणाला खिळून असलेले श्रीनिवास मात्र क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड करायचे. नवरा बायकोत सतत खटके उडायचे. पक्षाघाताच्या झटक्यामुळे नैराश्येत असलेल्या श्रीनिवास यांना बायकोने उलट उत्तर दिल्याचे सहन व्हायचे नाही. त्यामुळे नागरथ्ना नेहमीच भांडणात नमते घ्यायच्या. पण त्यादिवशी मात्र त्यांनी तयार केलेल्या सांबारवरून श्रीनिवास यांनी वाद उकरून काढायला सुरूवात केली. त्यांनी तयार केलेलं सांबार बेचव असल्याच सांगत चांगलच सुनावले. लवकरच दोघांमधील वादाने टोक गाठले. तू माझी काळजी घेत नाही, तसेच माझ्या अवस्थेलाही तूच कारणीभूत आहेस, असे आरोप त्यांनी नागरथ्नावर केले. नवऱ्याच्या या बोचऱ्या शब्दांमुळे दुखावलेल्या नागरथ्ना यांनी स्वत:ला खोलीत बंद करून घेतलं आणि नंतर गळफास लावून आत्महत्या केली.

वाचा : अवघड इंग्रजी सोपं करणाऱ्या शब्दकोशाच्या जनकाला ‘गुगल डुडल’द्वारे मानवंदना!