एकीकडे महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अनेक क्षेत्रांत महिलांनी देशाचे नाव उंचावले आहे. पण आजही भारतात अशी खेडी आहेत जिथे मुलींची जन्माला येण्याआधीच हत्या केली जाते. आणि जर दुर्दैवाने मुली जन्मला आल्याच तर चूल आणि मूल या गोष्टींमध्ये तिला अडकवले जाते. पण काही गावे अशीही आहेत ज्यांच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे. काही दिवसांपूर्वी आमीर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा आला होता. कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या मुली गीता, बबिता फोगट यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट होता. याच चित्रपटपासून प्रेरणा घेत येथल्या गावक-यांनी नवा उपक्रम राबवला आहे. या गावक-यांनी आपल्या घराबाहेरील नावाच्या पाटीवर मुलाचे किंवा वडिलांचे नाव न लावता त्याजागी घरातील मोठ्या मुलीचे नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंचांनी आपल्या घरापासून याची सुरूवात केली आहे.

वाचा : १४ वर्षांच्या हर्षवर्धनसोबत गुजरात सरकारचा ५ कोटींचा करार!

हरियाणामधल्या ‘कमोद’ गावातील सरपंचांनी मुलींना शिकवण्यासाठी आणि त्यांचे उत्तम करिअर घडावे यासाठी नवा उपक्रम हाती घेतला आहे. लोकांनी मारलेल्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत महावीर सिंग फोगट यांनी आपल्या मुलींना कुस्तीचे शिक्षण दिले. त्यांच्या मुलींनी देशाची मान अभिमानाने उंचावली. यापासून प्रेरणा घेत महावीर सिंग फोगाट यांच्या बल्लाली गावापासून १५ किलोमीटर दूर असलेल्या कमोद गावाने मुलींचे समाजातील स्थान अधिक सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दंगल पाहून या गावच्या सरपंचांनी आपल्या घरातील मोठ्या मुलीच्या नावाची पाटी आपल्या घराबाहेर लावली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार या गावातील इतर लोकांनी सरपंचांचे अनुकरण करत आपल्या घराबाहेर घरातील मुलांऐवजी मुलींच्या नावाची पाटी लावायला सुरूवात केली. ‘मुलगा हा वंशांचा दिवा आहे अशी मानसिकता भारतीयांची आहे, त्यामुळे एखाद्ये घर त्या मुलाच्या नावानेच ओळखले जाते पण भारतीयांच्या या मानसिकतेत बदल घडून मुलींना समाजात त्यांचे योग्य स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला असल्याची माहिती संजय रामपाल यांनी या वृत्तपत्राला दिली. हरियाणामधल्या ‘कमोद’ या गावात मुलींची संख्या जास्त आहे. येथे १००० हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण हे १३०० आहे.

वाचा : मुलावर उपचार करा, नाही तर इच्छामरण द्या!; हतबल पित्याचे पंतप्रधान मोदींना पत्र