लग्नाबाबत प्रत्येकाचे एक स्वप्न असते. अनेकांकडून ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी आलिशान सजावट, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, नाच-गाण्यांचे आयोजन केले जाते. इतकं असूनही कधी कधी ऐन लग्नात गोंधळ उडतो. नवरदेवाने मद्य प्राशन केल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे लग्न मोडल्याचे आपण अनेकवेळा ऐकले असेल. भारतात अशा घटना घडू शकतात. परंतु, फक्त यामुळेच लग्न मोडू शकते असे नाही. इतर कारणेही यामागे असून शकतात. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लखनऊपासून सुमारे ७० किमी अंतरावर असलेल्या कुर्मापूर गावात दि. १४ एप्रिल रोजी एक लग्न होते. त्या लग्नात असाच एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. वऱ्हाडी मंडळी वाजत-गाजत आले होते. त्याचदरम्यान नवरदेवाचा भाऊ आणि नववधूच्या पाहुण्यांमध्ये वाद सुरू झाला.

नवरदेवाचा चुलत भाऊ मनोजने दोन रसगुल्ल्यांची मागणी केली. पण नवरीमुलीच्या पाहुण्यांनी रसगुल्ले देण्यास विरोध करत फक्त एकच रसगुल्ला मिळेल, असे म्हटले. त्यानंतर दोन्ही पाहुण्यांमध्ये भांडणास सुरूवात झाली. वाद इतका वाढला की, हातातल्या प्लेट्सही एकमेकांकडे फेकून मारण्यात आल्या. जेव्हा ही गोष्ट नवरदेव व नवरीमुलीच्या वडिलांना कळली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मनोज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नवरीमुलीच्या वडिलांना शिवीगाळ करत त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. अखेर हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी हा वाद मिटवून लग्न लावण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा या वादाची माहिती नवरीमुलीला समजली तेव्हा तिने लग्नालाच नकार दिला. आपल्या वडिलांचा झालेला अपमान आणि त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीमुळे नवरीमुलीने लग्नासच नकार दिला. त्यामुळे हे लग्न काही होऊ शकले नाही.