उन्हाने शरिराची लाही लाही होत असताना अचानक आलेल्या पावसाने देशवासियांना दिलासा मिळाला आहे यात शंकाच नाही. पण पावसाने मात्र बंगळुरु शहरात राहणाऱ्या लोकांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. कारण वार्थूर तलावातून विषारी फेस म्हणजेच ‘टॉक्सिक फोम’ बाहेर पडू लागला आहे. पाऊस, त्यातून वाऱ्यामुळे हा फेस रस्त्यावर दूरदूरपर्यंत पसरला आहे. त्यामुळे रस्त्यात वाहतुकीची मोठी कोंडी झाली. चालकांना वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. टॉक्सिक फोममुळे इथे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे. त्याचबरोबर रस्त्यावर अपघात होण्याची भीती वाढलीये. इतक्या मोठ्या प्रमाणात तलावातून विषारी फेस बाहेर येण्याचा प्रकार रहिवाशांनी यापूर्वी कधी पाहिला नसेल. एकीकडे आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला नुकसान पोहोचवायला सुरुवात केली. कारखान्यातून निघणारे विषारी पाणी तलावात, नद्या नाल्यात सोडले. पर्यावरणाचा ऱ्हास केला पण त्यातून आपणच आपला नाश ओढवून घेतलाय हे यासारख्या घटनेतून दिसून येतंय.